
मागील आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यातील तब्बल 118 गावांना फटका बसला आहे. या पावसाने आंबा, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. कृषी विभागाच्या पथकांनी केलेल्या नजर पाहणीत जिल्ह्यात 452.17 हेक्टर क्षेत्रावरील शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. जवळपास 1 हजार 57 शेतकरी बाधित झाले असून त्यांचे पंचनाम्यांचे काम सुरू आहे.
आधी अवकाळी आणि नंतर मान्सूनने मे महिन्यात जोरदार एण्ट्री केली. पावसाने आपल्या आगमनाची वर्दी देताना रायगडकरांना अक्षरशः बेजार करून सोडले आहे. वादळी वाऱ्यांसह बरसणाऱ्या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मे महिन्याच्या अखेरीस उन्हाळी भातशेतीची कापणी सुरू होती, परंतु त्यापूर्वीच आलेल्या पावसाने सगळे वाहून नेले. डोळ्यांसमोर उभे पीक शेतात आडवे झाल्याने शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.
उन्हाळी भातपिकाने रडवले
रायगडमध्ये कर्जत, पेण, रोहा आणि माणगावबरोबरच खालापूर आणि पाली तालुक्यात काही प्रमाणात उन्हाळी भातपीक घेतले जाते. उन्हाळी भातपिकांचे अवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले. उन्हाळी भातपिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांना रडवले, तर फळे फेकून देण्याची वेळ बागायतदारांवर आली आहे.
आंब्याचा हंगाम लवकर संपल्याने नुकसान कमी
पोलादपूर, उरण, पनवेल, कर्जत या चार तालुक्यात सर्वात जास्त आंबा पीक घेतले जाते. सुदैवाने यंदा आंब्याचा हंगाम लवकर संपल्याने नुकसानीचे प्रमाण तुलनेत कमी झाले असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.