
रायगड जिल्ह्यातील 16 दरडग्रस्त गावांना मरणाच्या खाईत ढकलले आहे. या गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव सरकारने वर्षभरापासून लटकवल्याने ग्रामस्थांच्या नशिबी ‘इर्शाळवाडी’चा धोका निर्माण झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात एखाद्या गावावर दरड कोसळली तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. सरकारने लवकरात लवकर पुनर्वसनाचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर 19 जून 2023 रोजी महाकाय दरड कोसळल्याने 84 जणांचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यात गेल्या 20 वर्षांत अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामध्ये सुमारे 500 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात जिल्हा प्रशासनाला अधिक दक्षता घ्यावी लागत आहे.
दरडप्रवण, पूरप्रवण क्षेत्राचे भौगोलिक सर्वेक्षण करून त्यानुसार उपाययोजना करण्याची कामे करण्यात येतात. भूवैज्ञानिक विभागातर्फे केलेल्या सर्वेक्षणात महाड तालुक्यातील 9, म्हसळा, कर्जत, श्रीवर्धन, खालापूर तालुक्यातील प्रत्येकी 1, पोलादपूर तालुक्यातील 6 अशा 19 गावांचे पुनर्वसन करण्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला पाठवला.
भूवैज्ञानिक विभागातर्फे केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार जिल्हा प्रशासनाने 19 गावांचा पुनर्वसन प्रस्ताव शासनाकडे दिला होता. या प्रस्तावात त्रुटी असल्याने त्या दूर करून पुन्हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शासनाने जिल्हा प्रशासनाला केल्या. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने पहिल्या प्रस्तावातील त्रुटी दूर करून सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे वर्षभरापूर्वी सादर केला आहे. मात्र हा प्रस्तावदेखील अद्यापि मंजूर न झाल्याने 19 गावांत राहणाऱ्या रहिवाशांवर पावसाळ्यात भीतीची टांगती तलवार कायम असल्याचे दिसून आले आहे.
या गावांचे होणार पुनर्वसन
महाड – मोरेवाडी, शिगरकोंड, पातेरीवाडी, तुडील (लोअर तुडील), पारमाची, कोंडीवते, मोहित (भिसेवाडी सुतारवाडी), आब शिवथर, सह्याद्रीवाडी. म्हसळा – वावे (शेख मोहल्ला) खालापूर सुभाषनगर. कर्जत – मदे बुद्रुक. श्रीवर्धन – बागमांडले. पोलादपूर कुडपण खु., चांदके खु., कामथे माडाची वाडी, कामथे फौजदारवाडी, खोपड, वाकण, धामणीची वाडी.