
ईशान्य भारतात गेल्या चार दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. आसाम, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय यासह अनेक राज्यांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत किमान 34 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील 19 जिल्ह्यांमधील 764 गावे पुरामुळे बाधित आहेत. सुमारे 3.6 लाख लोक प्रभावित झाले आहेत. आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
दिब्रुगड आणि नीमतीघाटसह अनेक ठिकाणी ब्रह्मपुत्र नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे. याशिवाय इतर पाच नद्यांच्या पाण्याची पातळीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. 10 हजारांहून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी इशारा दिला की, राज्य आणि शेजारच्या भागात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात आणि नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
आसाम सरकारने पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्यमंत्री जयंत मल्ला बरुआ यांनी ही माहिती दिली. सिक्कीमच्या उत्तरेकडील भागात परिस्थिती आणखी गंभीर असून, याठिकाणी 1500 हून अधिक पर्यटक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कर आणि हवाई दलाची मदत घेतली जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्व सिक्कीममधील नेमाचेन प्रेमलखाजवळ भूस्खलन झाले आहे, त्यामुळे प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचा आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मेघालयातील 10 जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचप्रमाणे, त्रिपुरामध्येही 10 हजारांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, मदत आणि बचाव कार्यासाठी हवाई दल आणि आसाम रायफल्स तैनात करण्यात आले आहेत. बाधित भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी नेले जात आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी आसाम, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी आणि मणिपूरच्या राज्यपालांशी फोनवरून संवाद साधला आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.