
पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच विधान भवनात टोळीयुद्ध भडकले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गटांमध्ये विधान भवनाच्या लॉबीत तुफान हाणामारी झाली. एकमेकांचे कपडे फाडेपर्यंत दोघांचे कार्यकर्ते भिडले. त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे.
राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या पोस्ट मधून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला, ते म्हणाले, ”मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्यांच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच जर या लोकांना माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.