Ratnagiri News – गणपती बाप्पा मोरया… यंदाही खड्डे भरूया! ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाची धावाधाव

मुंबई-गोवा महामार्गाचे काम ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे रखडले आहे. रखडलेल्या कामांमुळे यंदाही गणेशोत्सवात राष्ट्रीय महामार्ग विभागाला धावाधाव करावी लागली आहे. महामार्गावर खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे त्या ठिकाणी पेजवर ब्लॉक बसवण्यात येत आहेत.

मुंबई-गोवा महामार्ग गेली 17 वर्षे रखडलेला आहे. दरवर्षी या रखडलेल्या महामार्गावरून प्रवास करताना चाकरमान्यांचे कंबरडे मोडते. पावसळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवास खडतर होतो. अनेक ठिकाणी डायव्हर्जन, खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य या सर्वांमधून वाहनचालकाला कसरत करत वाहन चालवावे लागते.

पाण्याच्या निचरा होण्यासाठी दुभाजकात गटार

गणेशोत्सव जवळ येताच राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरूवात केली आहे. महामार्गाशेजारी अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आल्याने भरपावसात पाण्याचा प्रवाह रस्त्यावर येऊन रस्त्यातच तळे तयार होते. त्यातून सुटका होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने पाण्याचा निचरा करण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. ज्या भागात पाणी साचून वाहतूकीला अडथळा निर्माण होतो अशा ठिकाणाचा शोध घेऊन त्या रस्त्याच्या ठिकाणी दुभाजकाजवळ पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारासारखे मार्ग तयार करण्यात येत आहेत. ज्या भागात खड्ड्यांचे साम्राज्य आहे, त्या भागात सपाटीकरण करून खड्डे भरण्यात येत आहेत. काही ठिकाणी पेवर ब्लॉक बसविण्यात येत आहेत.