सामना अग्रलेख – … आणि ईव्हीएमचे पानिपत झाले!

मोदी, शहा, फडणवीसांच्या षड्यंत्रात निवडणूक यंत्रणा, सरकारी प्रशासन व न्यायालये सामील आहेत. मोदी-शहांनी 50-60 जागांवर विजय चोरला व ते सत्तेवर आले. महाराष्ट्रात फडणवीस-मिंध्यांनी तेच केले. त्यामुळे लोकशाही, स्वातंत्र्याचे करायचे काय? अशी हतबलता लोकांत आली आहे व न्यायालयेही असत्याच्या बाजूने झुकत असल्याचे पाहून एक निराशा येत असते. या सगळ्यांसाठी मोहित कुमारचा लढा आणि विजय प्रेरणादायी आहे. सुप्रीम कोर्टाने आता बिहार निवडणूक मतदार यादीचे प्रकरण गांभीर्याने घेतले. राहुल गांधी यांनीही निवडणूक घोटाळ्याविरुद्ध रणशिंग फुंकले आहे व मोहित कुमारने ईव्हीएमचा निकाल खोटा ठरवून विजय मिळवला. त्यामुळे लढाई सुरू ठेवावीच लागेल. मोहित कुमार हा भ्रष्ट निवडणूक आयोगाविरुद्ध लढ्याचा ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’ ठरेल!

मोदी, शहा, फडणवीस, मिंधे वगैरे लोक निवडणुकांत घोटाळे करून जिंकले हे आता उघड झाले आहे, पण पराभूतांनी मोदी, शहा, फडणवीसांच्या नावाने खडे फोडण्याऐवजी मोहित कुमारचा संघर्ष आणि त्यातून मिळालेल्या विजयाची कहाणी समजून घेतली पाहिजे. हरयाणाच्या पानिपत जिल्ह्यातील बुआना लाखू गावच्या मोहित कुमारने भारताचा चवचाल निवडणूक आयोग व भाजपच्या जोरदार कानफटात लगावली. त्यामुळे भाजपच्या निवडणूक पोंगा पंडितांना दिवसाही तारे दिसले असतील. मोहित कुमारची कहाणी सोपी आहे. बुआना लाखू गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला. मोहित कुमारने या निकालावर जोरदार आक्षेप घेतला. मोहित कुमार पराभूत झाला यावर तो स्वतः व त्याचे समर्थक विश्वास ठेवायला तयार नव्हते. निकालानंतर त्याचे समर्थक रस्त्यावर उतरले व गोंधळ घालू लागले. मोहित कुमारने गावकऱ्यांना समजावून सांगितले, ‘‘राडा करून उपयोग नाही. इकडले प्रशासन, सरकार त्यांचे आहे. त्यामुळे ते आपला आवाज दाबतील. आपण न्यायालयीन लढाई करू. मला विश्वास आहे, आपली बाजू सत्याची आहे. सत्य विजयी होईल.’’ बुआना लाखू गावात सरपंचपदासाठी 2 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक झाली होती. त्यात भाजप समर्थक कुलदीप सिंहला विजयी घोषित केले होते. मतदान ईव्हीएमवर झाले व ईव्हीएममध्ये गडबड असल्याने निकाल चुकीचा लागला, अशी याचिका घेऊन मोहित कुमारने सुप्रीम कोर्टात मतमोजणीलाच आव्हान दिले. या प्रकरणास अनेक कंगोरे आणि लबाड्या आहेत. पानिपतच्या अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांनी याच प्रकरणातील एका निर्णयात बूथ क्रमांक 69 मधील

मतांची फेरमतमोजणी

करण्याचे आदेश दिले होते, पण हा आदेश पंजाब-हरयाणा हायकोर्टाने रद्द केला, पण मोहित कुमार थांबला नाही. त्याने हायकोर्टाच्या निर्णयाला थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. सुप्रीम कोर्टात भल्याभल्यांच्या निवडणूक याचिका रखडल्या असताना हरयाणातील एक कार्यकर्ता सरपंच निकाल घोटाळ्याची याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात उभा राहिला हे मजेशीर होते. सरपंचपदाच्या घोटाळ्यावर सुप्रीम कोर्ट मोहित कुमारचे म्हणणे ऐकेल काय? हा प्रश्न अनेकांना पडला. 31 जुलैला हे प्रकरण कोर्टासमोर सुनावणीस आले आणि कोर्टाने ईव्हीएम व सर्व रेकॉर्डस् सादर करण्याचे आदेश दिले. सुप्रीम कोर्टाने या वेळी लोकशाहीची बूज राखण्याचे ठरवले व मोहित कुमारचे म्हणणे ऐकून घेतले. सरकारनेही मोहित कुमारला खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला, पण सुप्रीम कोर्टाने मोहित कुमारचे म्हणणे नुसते ग्राह्य मानले नाही, तर एका बूथची मतमोजणी करण्याऐवजी त्या निवडणुकीची सर्वच मतमोजणी करण्याचे आदेश दिले. सुप्रीम कोर्टाने निवडणुकीत वापरल्या गेलेल्या सर्व ईव्हीएम आणि नोंदी मागवल्या व कोर्ट रजिस्ट्रारच्या देखरेखीखाली पुन्हा मतमोजणी केली आणि काय आश्चर्य! मोहित कुमार सरपंचपदी प्रचंड मतांनी निवडून आला. हरयाणा प्रशासन, राज्य निवडणूक आयोग, पंजाब-हरयाणा हायकोर्ट सपशेल उताणे पडले. त्यांचे पानिपत झाले. ईव्हीएमच्या पोटातले सत्य सुप्रीम कोर्टाच्या टेबलावरच बाहेर पडले. ही ऐतिहासिक घटना आहे. भारतीय जनता पक्ष व त्याचा हस्तक असलेला निवडणूक आयोग निवडणूक यंत्रणेत कसा भ्रष्टाचार करीत आहे ते मोहित कुमारने दाखवून दिले. सुप्रीम

कोर्टासमोर पहिल्यांदाच

ईव्हीएममधील मतमोजणी झाली व पराभूत उमेदवार विजयी झाला. म्हणजे गेल्या दहा वर्षांत मोदी, शहा, फडणवीस वगैरे लोकांनी असे किती विजय चोरले असतील व किती पराभूत बनचुक्यांना ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी घोषित केले असेल? मतदार याद्यांत घोटाळे आहेत व ईव्हीएम म्हणजे ‘चोरी’ करण्याचे डबडे आहे हे मान्य, पण पराभवानंतर मोहित कुमारने जे केले, ते एका योद्धय़ाचे कर्तव्य ठरते. नुसते ईव्हीएम, निवडणूक आयोगावर खापर पह्डून चालणार नाही. मोदी, शहा, फडणवीसांच्या षड्यंत्रात निवडणूक यंत्रणा, सरकारी प्रशासन व न्यायालये सामील आहेत. तरीही लढण्याची उमेद आणि जिद्द कायम ठेवावी लागेल. उत्तर-पूर्व मुंबईत अमोल कीर्तिकरांचा विजय मिंधे गटाने चोरला, जयपूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी होऊनही पराभूत घोषित केला गेला. अशा पद्धतीने मोदी-शहांनी 50-60 जागांवर विजय चोरला व ते सत्तेवर आले. महाराष्ट्रात फडणवीस-मिंध्यांनी तेच केले. त्यामुळे लोकशाही, स्वातंत्र्याचे करायचे काय? अशी हतबलता लोकांत आली आहे व न्यायालयेही असत्याच्या बाजूने झुकत असल्याचे पाहून एक निराशा येत असते. या सगळ्यांसाठी मोहित कुमारचा लढा आणि विजय प्रेरणादायी आहे. सुप्रीम कोर्टाने आता बिहार निवडणूक मतदार यादीचे प्रकरण गांभीर्याने घेतले. राहुल गांधी यांनीही निवडणूक घोटाळ्याविरुद्ध रणशिंग फुंकले आहे व मोहित कुमारने ईव्हीएमचा निकाल खोटा ठरवून विजय मिळवला. त्यामुळे लढाई सुरू ठेवावीच लागेल. मोहित कुमार हा भ्रष्ट निवडणूक आयोगाविरुद्ध लढ्याचा ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’ ठरेल!