
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यवान हातांनी आणि विचारांनी शिवसेना स्थापन झाली. मराठी माणसांच्या स्वाभिमानातून हा अंगार उसळला, हिंदुत्वाची ज्वलंत भूमिका आणि आंदोलनातून शिवसेनेचे तेज उसळले. ते कसे विझेल? काही विकाऊ लोक महाजनांसारख्या नाच्यांबरोबर ‘ठुमके’ मारू लागले म्हणजे शिवसेना जमीनदोस्त झाली असे होत नाही. शिवसेना जमीनदोस्त करण्याचे स्वप्न घेऊन नाचणारे अनेक नाचे महाजन याच जमिनीत गाडले गेले हा इतिहास आहे. महाजन, तुम्हीही त्याच मार्गाने निघाला आहात. हा महाराष्ट्र अमित शहांच्या नीच राजकारणाला शरण जाणार नाही!
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करू, अशी मस्तवाल भाषा भाजपचे एक मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. सत्तेवरचा माणूस मदांध झाला की काय होते त्याचा उत्तम नमुना म्हणजे हे महाजन. शिवसेना जमीनदोस्त करण्याच्या वल्गना गेल्या पन्नास वर्षांत महाजनांसारख्या अनेकांनी केल्या. शिवसेना म्हणजे फक्त खासदार, आमदार, नगरसेवक असा विकाऊ माल नाही. शिवसेना हे एक विचाराने पुढे जाणारे संघटन आहे. निवडणुका येतात- जातात. आमदार, खासदार वगैरे लोकही प्रवाहपतित होतात, पण शिवसेना आहे व राहणारच. ज्यांना शिवसेनेने नाव, रूप, प्रतिष्ठा, ताकद दिली अशा अनेकांना कधी काँग्रेसने, कधी राष्ट्रवादी काँग्रेसने, तर कधी सध्याच्या भारतीय जनता पक्षाने मोहात पाडून विकत घेतले. तरीही शिवसेना आहेच आणि राहील. खरे म्हणजे ‘शिवसेना संपवू, जमीनदोस्त करू’ अशी ‘आपटाआपटी’ महाजनसारख्यांना रोज करावी लागते यातच शिवसेनेच्या ताकदीची कल्पना येते. गिरीश महाजन यांचा उल्लेख सध्याच्या राजकारणात ‘नाच्या’ असा केला जातो व ते खरे असावे. फडणवीस यांच्या मागेपुढे ठुमके देत नाचण्याशिवाय या माणसाचे तसे कर्तृत्व नाही. ज्या जामनेर मतदारसंघात हे महाशय निवडून येतात तो संपूर्ण भाग आजही भकास व स्मशानासारखा आहे. लोकांना किमान नागरी सुविधा तेथे उपलब्ध नाहीत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाजन हे ‘जेमतेम’ मताधिक्याने निवडून आले. मतदार यादीतली हेराफेरी, पैशांचे प्रचंड वाटप यामुळे त्यांना निसटता विजय मिळाला. मते विकत घेणे, इतरांचे निवडून आलेले लोक विकत घेणे हा त्यांचा धंदा आहे आणि त्यांचे इतर अवांतर धंदे व छंद काय आहेत याबाबत सन्माननीय एकनाथ खडसे यांनी वारंवार प्रकाशझोत टाकला आहे. महाजन यांनी आर्थिक घोटाळे, बँका, जमिनी हडपणे, पतपेढ्यांतील अफरातफर, टेंडरबाजी, दलाली यातून
हजारो कोटींची संपत्ती
गोळा केली व आपल्या अवतीभोवती अशाच दलालांचे जाळे निर्माण केले. यातून त्यांना एक नशा चढली आहे, पण हा माणूस एक नंबरचा डरपोक आणि पळपुटा आहे. उद्या महाराष्ट्रातून भाजपची सत्ता गेली तर कुंपणावरून उडी मारून भाजपचा त्याग करणारा गिरीश महाजन हा पहिला भाजपवाला असेल. त्यांच्या काही भानगडींची चौकशी मागच्या सरकारने सुरू केली होती तेव्हा त्यांची पळापळ झाली होती. ते भूमिगतही झाले होते. भीतीमुळे त्यांना चार-पाच वेळा रोज विजारी बदलाव्या लागत होत्या व ते सरकारला निरोप पाठवत होते की, ‘‘मी वाटल्यास राजकारणातून बाजूला होतो, पण माझ्यामागचा चौकश्यांचा ससेमिरा थांबवा. मी तर तुमचाच आहे भौ.’’ म्हणजे हे सगळे सत्तेच्या खुर्चीवरचे ‘दादा’ आणि ‘भाई’ आहेत आणि ईडी, पोलीस यांच्या हातात नसतील तर हे बिळातले उंदीर आहेत! सत्तेचे वैधव्य आले तर ईडी, पोलीस यांसारख्या तपास यंत्रणा हातात असलेल्यांच्या वळचणीला जाऊन बसणाऱ्यांमध्ये गिरीश महाजन सगळ्यात पुढे असतील. वास्तविक, महाराष्ट्रात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या उत्तर महाराष्ट्रातून महाजन येतात तेथील शेतकरी अवकाळी व इतर संकटांमुळे हवालदिल झाला आहे. शेतकरी जमीनदोस्त झाला, पण महाजन हे जमीनदोस्त शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करायला निघाले आहेत. अमित शहांचे हस्तक यापेक्षा दुसरा कोणता विचार करू शकतात! महाजन यांनी राज्यात भ्रष्टाचारी, ठेकेदार व गुंडांच्या टोळ्या पोसल्या आहेत. महाराष्ट्रातील गुंडगिरीचे सूत्रधार म्हणून गृहमंत्री फडणवीस यांनी या माणसावर कारवाई केली पाहिजे, पण स्वतः गृहमंत्री गुंडांच्या या पोकळ सरदाराला सोबत घेऊन फिरत आहेत याचे आश्चर्य वाटते. जळगाव, रावेर, धुळय़ातील प्रत्येक गंभीर गुन्हय़ात महाजनांनी पोसलेले गुंड सहभागी आहेत. विरोधात काम करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांना पोलिसांचा गैरवापर करून
खोट्या गुन्ह्यात
अडकवायचे, त्यांच्यावर दबाव आणायचा व नंतर त्याच लोकांना भाजपमध्ये सामील करून घ्यायचे असा धंदा महाजन यांनी सुरू केला आहे. शिवसेनेतील काही लोक याच पद्धतीने महाजन यांनी गळाला लावले. हे शौर्य किंवा मर्दुमकी नाही, तर नाचेगिरी आहे. महाजन यांच्या इतर कर्तबगारीविषयी अनेक रकाने भरता येतील, पण काळाने ती जबाबदारी त्यांचे एकेकाळचे गुरू महाराज एकनाथ खडसे यांच्यावर सोपवली आहे. गिरीश महाजन यांनी त्यांना हवे ते करावे. यांचे-त्यांचे पक्ष फोडावेत. निदान तशा वल्गना कराव्यात, पण भारतीय लोकशाही ही प्रामाणिक जनतेच्या करंगळीवर गोवर्धन पर्वतासारखी तरली आहे हे ध्यानात ठेवावे. महाजन हे इतर पक्ष संपविण्याची भाषा करीत आहेत, पण त्यांचा भारतीय जनता पक्ष शिल्लक राहिला आहे काय याचा त्यांनी आधी शोध घ्यावा. कारण आजचा भारतीय जनता पक्ष हा मूळ भाजप नसून इतर पक्षांतून आणलेल्या बेइमान, भ्रष्ट लोकांच्या घुसखोरीने तरारलेला पक्ष बनला आहे. भाजपकडे स्वतःचे असे काही उरले आहे काय? प्रफुल्ल पटेलसारखे (इक्बाल मिर्ची फेम) लोक भाजपचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनले आहेत. त्यामुळे शिवसेना जमीनदोस्त करण्यासाठी तुम्हाला पवित्र हात लाभणार नाहीत. मुळात तुमचे शंभर बाप आले तरी ते शक्य होणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यवान हातांनी आणि विचारांनी शिवसेना स्थापन झाली. मराठी माणसांच्या स्वाभिमानातून हा अंगार उसळला, हिंदुत्वाची ज्वलंत भूमिका आणि आंदोलनातून शिवसेनेचे तेज उसळले. ते कसे विझेल? काही विकाऊ लोक महाजनांसारख्या नाच्यांबरोबर ‘ठुमके’ मारू लागले म्हणजे शिवसेना जमीनदोस्त झाली असे होत नाही. शिवसेना जमीनदोस्त करण्याचे स्वप्न घेऊन नाचणारे अनेक नाचे महाजन याच जमिनीत गाडले गेले हा इतिहास आहे. महाजन, तुम्हीही त्याच मार्गाने निघाला आहात. हा महाराष्ट्र अमित शहांच्या नीच राजकारणाला शरण जाणार नाही!