
महाराष्ट्र आता कर्मकांड आणि भ्रष्टाचाराच्या मार्गाने निघाला आहे. आत्मविश्वास गमावलेले राज्यकर्ते व केंद्रीय तपास यंत्रणांमुळे ‘शेळ्या’ बनलेले पुढारी जादूटोणा, बळी प्रथेचा आधार घेतात तेव्हा पुरोगामी महाराष्ट्राचे काय होणार? हा प्रश्न पडतो.
भारतीय लोकशाहीची धूळधाण उडवणारे दशक म्हणून 2014 नंतरच्या कालखंडाकडे पाहायला हवे. 2014 नंतर मते विकत घेणे, जादूटोणा, मंत्रतंत्र, पक्ष विकत घेणे या प्रकारांना भारतीय राजकारणात महत्त्व प्राप्त झाले. ‘सदसद्विवेक बुद्धी’ हा शब्दच लोकशाहीतून नष्ट झाला. एक मनोरंजक छायाचित्र या आठवड्यात प्रसिद्ध झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले आहेत व त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अजित पवार, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, मुश्रीफ, सरनाईक, भुजबळ असे ‘चेहरे’ होते. गंमत म्हणजे या सगळ्यां ना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली श्री. फडणवीस व त्यांचा पक्ष चक्की पिसायला तुरुंगात पाठवणार होता. मात्र प्रत्यक्षात त्यांनी यापैकी अनेकांवर कारवाई करून दहशत निर्माण केली आणि आज हे सर्व लोक फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आनंदाने जगत आहेत. त्यातल्या अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाणांच्या घरी स्वतः अमित शहा यांनी पायधूळ झाडली व आमरस-पुरीचा पाहुणचार घेतला. भाजप हा शब्दाला, वचनाला, नैतिकतेला जागणारा पक्ष नाही. वारा येईल तशी पाठ फिरवणारे हे सर्व लोक आहेत. भाजपचे एक खासदार निशिकांत दुबे हे सतत मुसलमानांना शिव्या घालत असतात. हिंदू-मुसलमानांत तणाव होईल अशी त्यांची विधाने संसदेत व बाहेर असतात. हे दुबे महाशय आता सर्वपक्षीय शिष्टमंडळातून सौदी अरब, कुवेतसारख्या इस्लामी राष्ट्रांत गेले व तेथे जाऊन मुसलमान, इस्लामचे गुणगान केले. “भारतात हिंदू-मुसलमानांत भेद नाही. अल्पसंख्याक वगैरे विषय नाही. आम्ही सर्व एक आहोत. मुसलमानांच्या पाठीशी आम्ही आहोत,” असा मैसूरपाक दुबे यांच्या तोंडून इस्लामी राष्ट्रांत बाहेर पडला. ही सोय, संधीसाधूपणा व डरपोकपणाच आहे. भारतात गरळ ओकायची व इस्लामी राष्ट्रांत जाऊन ‘भारत निधर्मी’ आहे असे सांगायचे हे भाजपच्या सर्व दुब्यांचे चरित्र आहे.
‘नकली’ राजकारण
पंतप्रधान मोदी यांचे सर्व राजकारण ‘नकली’ आहे. त्यामुळे त्यांच्या भोवती ‘नकली’ लोकांचा भरणा आहे. पाकिस्तानबरोबर युद्ध सुरू केले तेव्हा त्या युद्धाच्या कारवाईची माहिती देण्यासाठी मोदी सरकारने सोफिया कुरेशी यांची निवड केली. आम्ही सेक्युलर आहोत हे जगाला दाखविण्याची त्यांची ही धडपड होती. प्रे. ट्रम्प यांच्या आदेशाने युद्धबंदी करून मोदी यांनी देशाचे नाक कापले, पण तरीही विजयाचे उत्सव साजरे केले. मोदी ‘युद्ध’ उत्सव साजरा करण्यासाठी गुजरातला गेले. त्या उत्सवात सामील होण्यासाठी सोफिया कुरेशी व त्यांच्या नातेवाईकांना खास आमंत्रित केले आणि त्या कुरेशी कुटुंबाकडून मोदींवर फुले उधळून घेतली. मुसलमान चोर, देशद्रोही, मंगळसूत्र चोर आहेत ही मोदी यांची निवडणूक प्रचारातली भूमिका होती, पण भारतीय सैन्यातील पा. कुरेशी भाजपला मतांच्या राजकारणासाठी व जगासमोर निधर्मी प्रतिमा निर्माण करण्यासाठी हव्या आहेत. या ढोंगावर कोणी बोलायचे नाही. जे बोलतील त्यांना देशद्रोही ठरवले जाईल.
शंखनाद कसला?
भाजपच्या राजवटीत संस्कार, संस्कृती व नैतिक मूल्यांचे कसे अधःपतन झाले याच्या बातम्या रोज प्रसिद्ध होत आहेत. गंगा-यमुनेत जितके प्रदूषण व कचरा आहे, त्यापेक्षा जास्त प्रदूषण भाजप व त्यांचे टाळ कुटणाऱ्यांच्या विचारांत आहे. वैयक्तिक पातळीवर जे हिंदू आहेत, त्यांना धर्मकार्ये, शंखनाद, व्रतवैकल्ये, घंटानाद अशा कामांत भाजपने गुंतवून ठेवले व त्यासाठी अनेक उपसंस्था निर्माण केल्या. जे भाजप परिवारात ‘नवहिंदू’ म्हणून सामील झाले, ते त्यांच्याही पुढे जाऊन अघोरी कार्य म्हणजेच हिंदुत्व असे मानून पुढे निघाले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञानवादी हिंदुत्वाच्या राजकीय विचारांचा स्पर्शही त्यांना झालेला दिसत नाही. भारतात जणू धार्मिक खिचडीच झाली आहे. ही खिचडी आज सगळ्यांनाच प्रिय आहे. धर्माचे विकृतीकरण होत असलेल्या कालखंडात आपण सगळे सध्या वावरत आहोत. एकनाथ शिंदे व त्यांच्या बरोबर शिवसेनेतून फुटलेल्यांच्या कर्मभूमीत म्हणजे गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात पंधरा दिवसांपूर्वी होतो. मी नास्तिक नाही, पण धर्माचे, व्रतवैकल्यांचे अतिरेकी अवडंबर म्हणजे हिंदू धर्म नाही असे मानणाऱ्या पंथातला मी आहे. त्या दिवशी रविवार होता व अमावस्या होती. कामाख्या मंदिर व परिसर प्रचंड गर्दीने ओसंडून वाहत होता. एक प्रकारचा सुकलेल्या रक्ताचा दर्प त्या परिसरात घोंघावत होता. दर्शनासाठी आलेल्या भक्तांकडे बदके, बकऱ्या व इतर प्राणी होते. ते देवीला बळी देण्यासाठी आणले होते, हे स्पष्ट दिसले. मंदिरात जाण्यासाठी प्रचंड रेटारेटी चालली होती. मंदिराचा गाभारा खोल आहे व रहस्यमय आहे. मूर्तीचे दर्शन घेऊन डावीकडे खोल जमिनीवर पाहिले तेव्हा अस्वस्थ झालो. जमिनीवर रेडे व बैलांची ताजी मुंडकी रांगेत ठेवली होती आणि त्यांच्या समोर ‘यजमान’ बसवून ‘पांडा’ मंडळी विधी करत होती. ताजे बळी प्रयोग मंदिराच्या मागच्या बाजूला झाले व ते मंदिरात आणले गेले. आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी व शत्रूचा काटा काढण्यासाठी हे ‘बळी विधी’ या मंदिरात देतात आणि ते सर्व हिंदुत्वाच्या नावाखाली खपवले जातात. महाराष्ट्रातील मागच्या पक्षांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडाबळी प्रसिद्ध पावले व त्याची आठवण गाभाऱ्यातील ‘पांडा’ लोकांनी माझ्याकडे काढली.
“आम्ही तुम्हाला ओळखतो. आप महाराष्ट्र के पालिटिशियन है” असे ते मला म्हणाले.
साडेतीन वर्षांपूर्वी या गाभाऱ्यात व मंदिराच्या परिसरात नेमके काय घडले हे त्यातील ‘पांडां’नी स्वतःच सांगायला सुरुवात केली.
“वो शिवसेना के लोगो ने यहां आकर बहोत विधी पूजा किया. पांडा लोगों को भारी दक्षिणा भी दिया.” पांडा.
“कितने लोग थे.” मी.
“वो एकसाथ पचास–साठ लोग आए थे.” पांडा.
“कौनसा पूजा किया?” मी.
“यहां जो होता है सब पूजा किया. बली भी चढाया देवी को.” पांडा.
“कौनसा बली दिया.” मी.
“भैसा को काटा. कुछ लोगोंने बदक को भी काटा. शत्रूपर विजय प्राप्त करने के लिए सभी ने बली चढाया.” पांडा.
पांडा म्हणाला, बहुतेक सगळ्यांनीच रेड्याचे व इतर प्राण्यांचे बळी चढवले. त्यातील 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंगे कापून सोबत नेली. या शिंगांना ‘सिंदूर’ लावून ती मंतरली जातात व ईप्सित स्थळी खोल पुरून मनोकामनेची पूजा केली जाते. त्यासाठी याच मंदिरातील पांडांना बोलावले जाते. मुंबई-महाराष्ट्रात ही शिंगे आणली गेली. ती सर्व मंतरलेली शिंगे कोणी कोठे पुरली ते रहस्यच आहे. शिंदे यांच्या काळात ही शिंगे ‘वर्षा’ बंगल्याच्या मागच्या बाजूला पुरली असे मी लिहिले तेव्हा खळबळ उडाली. मुख्यमंत्री फडणवीस ‘वर्षा’ बंगल्यावर पुरलेल्या शिंगांच्या भीतीपोटी राहायला जात नाहीत ही माहिती पक्की होती. आज फडणवीस ‘वर्षा’वर गेले व त्याआधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ‘वर्षा’ परिसरातील मोकळ्या जमिनीचे स्पानिंग करून घेतले. या शोध मोहिमेत तेथे पुरलेली रेड्यांची शिंगे मिळाली काय? हा पहिला प्रश्न व श्री. फडणवीस यांचे संपूर्ण समाधान झाले काय? हा दुसरा प्रश्न. अंधश्रद्धेविरुद्ध लढणारा असा हा पुरोगामी महाराष्ट्र. संत गाडगेबाबांपासून प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी या लढाया लढल्या. नरेंद्र दाभोळकरांना तर त्यासाठी बलिदान द्यावे लागले. त्या महाराष्ट्रात शेवटी अंधभक्ती व अंधश्रद्धेचे पेव फुटले आणि हे सर्व अंधश्रद्धाळू महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत व त्यांनी जनतेलाही कर्मकांडास जुंपले.
मूर्तिपूजा, कर्मकांड व बळी प्रथेविरुद्ध संत गाडगेबाबांनी आयुष्य वेचले तरीही हिंदू धर्मात व शक्तिपीठे समजल्या जाणाऱ्या आपल्या मंदिरांत हे सर्व सुरू आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रात कामाख्या मंदिराची प्रसिद्धी केली. त्यानंतर या मंदिराकडे महाराष्ट्रातील लोकांचा ओघ वाढला व ते बळी देण्यासाठी रांगेत उभे राहू लागले. ठाणे परिसरातील किमान शंभरावर लोक मला मंदिर परिसरात दिसले. पुरोगामी महाराष्ट्राची ही वाट बिकट आहे. कारण सर्व समस्यांवर जादूटोणा व शंखनाद हाच उतारा येथे ठरला आहे.
एखादे मांजरदेखील राजाकडे धीट नजरेने बघू शकते, पण महाराष्ट्रात स्वतःला ‘वाघ’ समजणाऱ्यांची अवस्था शेळ्यांसारखी झाली व ते हुकूमशहांना शरण गेले. मानसिक स्वास्थ्य आणि शत्रूवर विजय मिळविण्यासाठी जादूटोणा व अघोरी तंत्राचा आधार घेतला. शिंदे गटातले बहुतेक सर्व लोक या ‘अघोरी’ मार्गाला लागले व त्यांनी मासिक पगारावर असे विधी करणारे आणि कुंडल्या पाहणारे लोक नेमल्याची माहिती त्यातील एका आमदाराने दिली तेव्हा पुरोगामी महाराष्ट्राचे भविष्य नक्की काय? या चिंतेने मी अस्वस्थ झालो. डरपोक मनुष्य शेवटी अंधश्रद्धेच्या मार्गाने जातो. त्या सगळय़ांसाठी राल्फ इमर्सनचे एक वचन देतो आणि विषय संपवतो. इमर्सन म्हणतो, “ज्यांच्यापाशी आत्मविश्वास आहे ते कोणत्याही संकटावर मात करतात. दररोज एका तरी भीतीवर जो विजय मिळवत नाही त्याला आयुष्याने काहीच शिकवले नाही असे म्हटले पाहिजे.”
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]