
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभागरचना करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या आदेशानुसार जिल्हा परिषदेत 68 असलेली गटांची संख्या आता 61 झाली आहे. खानापूर जिल्हा परिषदेचा नवीन गट आणि बलवडी आणि करंजे या दोन गणांची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. 14 जुलैपर्यंत प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या म्हणजेच मिनी मंत्रालयाच्या वर्चस्वासाठी राजकीय वातावरण तापणार असून, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
राज्य शासनाने महापालिका आणि नगरपंचायत, नगरपरिषेच्या प्रभागरचना करण्याचे आदेश 10 जून रोजी दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्यांचे डोळे जिल्हा परिषदेच्या प्रभागरचनेकडे लागले होते. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रभागरचनेचे आदेश दिले. 2017 मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक झाली होती. त्यावेळी झेडपीचे 60 गट आणि पंचायत समितीचे 120 गण होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मुदत 20 मार्च 2022 रोजी संपली होती. ओबीसी आरक्षण आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने गट आणि गणांची नव्याने प्रभागरचना केल्याने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेच्या कारणामुळे वेळेत निवडणूक झाली नव्हती. महाविकास आघाडीच्या काळात नव्याने प्रभागरचना करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदचे 68 आणि पंचायत समित्यांच्या 136 गणांची रचना केली. त्यानुसार आरक्षणाची सोडतही काढण्यात आली. मात्र, महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर याला स्थगिती देण्यात आली होती. निवडणूक विभाग, निर्वाचन गणांची रचना करीत असताना जिल्हा परिषद व पंचायत समितीची एकूण लोकसंख्या भागीले, त्या गट आणि गणास देय असलेली एकूण सदस्यसंख्या या सूत्रानुसार निवडणूक जिल्हा परिषद गट व गणांची सदस्यसंख्या निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले होती. याशिवाय जिल्हा परिषद गट व गणांची सरासरी लोकसंख्या 10 टक्के कमी किंवा 10 टक्के जास्त ठेवता येईल.
आता शासनाच्या नव्या आदेशानुसार 68 गटांची संख्या 61 करण्यात आली आहे. गतनिवडणुकीपेक्षा एक नवीन गट आणि पंचायत समितीचे दोन नवीन गण तयार झाले आहेत. खानापूर तालुक्यात यापूर्वी नागेवाडी, लेंगरे आणि भाळवणी असे तीन गट होते. आता नव्याने खानापूर मतदारसंघ आणि बलवडी व करंजे या दोन गणांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या रचनेनुसार 61 गट आणि 122 गणांत निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. प्रभागरचना करताना 2017 मधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रभागरचना विचारात घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रचना करताना शक्यतो ग्रामपंचायतीचे विभाजन होणार नाही, याचीही दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या कालावधीत होणार प्रभागरचना
गटांची आणि गणांची प्रारूप प्रभागरचना 14 जुलैपर्यंत प्रसिद्ध करण्यास मुदत देण्यात आली आहे. तसेच प्रसिद्ध केलेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी यांच्याकडे सूचना सादर करण्यासाठी 21 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. प्राप्त हरकतींच्या आधारे जिल्हाधिकारी आपल्या अभिप्रायासह प्रस्ताव 28 पर्यंत विभागीय आयुक्तांना देतील. दि.11 ऑगस्टपर्यंत आलेल्या सूचनांवर आणि हरकतींवर विभागीय आयुक्त सुनावणी घेऊन निर्णय घेतील. 18 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभागरचनेस मान्यतेसाठी जिल्हाधिकारी प्रस्ताव सादर करतील.
महापालिकेच्या अगोदर झेडपीची रणधुमाळी
महापालिकेच्या प्रभागरचनेस अंतिम यादी प्रसिद्ध देण्यासाठी दि. 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अंतिम प्रभागरचनेस 18 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिकेपूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुक होण्याचे संकेत आहेत. गट आणि गणांच्या प्रभागरचनेचे आदेश दिल्यामुळे ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.