
दत्तक घेतलेल्या नाशिक शहराचे फडणवीसांनी अनाथआश्रम करून टाकला अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच नाशिकमध्ये गुजराती कंत्राटदार येणार आणि पाच ते दहा हजार कोटी रुपये घेऊन जाणार, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला मुदत दिली आहे. त्या चौकटीत राहून महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिकांची तयारी सरकारला करावीच लागेल. त्याच दृष्टीने सगळे कामाला लागलेले आहेत. तीन साडेतीन वर्ष महानगरपालिका प्रशासकाच्या माध्यमातून लुटल्या जातात. आयुक्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून टँकरबाजी, भ्रष्टाचार घोटाळा. शहरांची अवस्था पाहा तुम्ही काय झाली आहे. महानगर पालिका ही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लोकांची सेवा करणार संस्था आहे. तुम्ही तिथेही तीन साडेतीन वर्ष निवडणूक होऊ दिली नाही याला काय म्हणायचं. लोकशाहीची ही कुठली तऱ्हा. लोकांना त्यांचे नगरसेवकच द्यायचा नाही. त्यांच्या नेहमीच्या सोयी दिवा, बत्ती, पाणी आरोग्य शिक्षण, रस्ते, साफसफाई त्याही तुम्ही होऊ दिल्या नाहीत का तर राजकारण. आणि मग शेवटी सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला खडे बोल सुनावले. आणि त्यानंतर तुम्ही त्या तयारीला लागलेला आहात. आता नाशिकची अवस्था पाहा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आले होते आणि त्यानी कुंभमेळ्याची तयारीचा आढावा घेतला. पण नाशिकमध्ये एका पावसात पाणी तुंबलं होतं. फडणवीसांनी हे शहर दत्तक घेतलं होतं ना. त्याचे तुम्ही अनाथआश्रम करून टाकलंत. फडणवीस दोन दिवस नाशिकमध्ये आहेत. त्यांनी गाडी काढावी आणि शहरामध्ये फिरावं. वाटल्यास प्रत्येक पक्षाचे दोन नगरसेवक घ्यावेत आणि त्यांच्याकडून नाशिक शहर समजून घ्या. मग कळेल गेली तीन वर्ष याच शहराशी नव्हे तर 27 महानगरपालिका हद्दींची वाट लागली आहे.
तसेच ज्यांना हे राज्य समजलेले नाही, ज्यांना राज्याच्या समस्या समजलेले नाही. आडातच नाही तर पोहरामध्ये कुठून येणार. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राज्याच्या प्रश्नाविषयी किती गांभीर्य आहे? एकनाथ शिंदे यांना राज्याच्या प्रश्नाविषयी किती गांभीर्य आहे? टेंडर, पैसे गोळा करणे, लोकांना पैसे वाटणं, पक्ष फोडणं. अजित पवार. एकनाथ शिंदे आणि फडणवीसही तेच करत आहेत. राज्याचे प्रश्न सोडवायचे कुणी, राज्याला प्रतिष्ठा मिळवून द्यायची कोणी? या संदर्भात त्यांच्याकडे काही नियोजन आहे असे वाटत नाही असेही संजय राऊत म्हणाले.
नाशिकमध्ये साडेसहा हजार कोटींपैकी किती कामं होणार आहेत? या कुंभमेळ्यात दहा हजार कोटींचा खुर्दा उडणार आहे. कुंभमेळा हा आमचा एक सांस्कृतिक वारसा आहे. तो उत्तमरित्या पार पडला पाहिजे. पण कुंभमेळ्याच्या नावाने प्रयागराजपासून ते नाशिकपर्यंत सरकारी पैश्यांची कशी लूट होणार आहे, हे तुम्ही पहायला पाहिजे. प्रयागराजमध्ये सर्व कंत्राटदार हे गुजरातमधून आले होते. नाशिकच्याही कुंभमेळ्यात यापेक्षा वेगळे काही होईल असे वाटत नाही.
कुंभमेळ्यातील हजारो कोटी रुपयांपैकी किमान पाच ते दहा हजार कोटी हे गुजरातच्या ठेकेदारांकडेच जाणार आहेत. स्थानिक कंत्राटदाराला यात काहीही मिळणार नाही. सगळे ठेकेदार हे गुजरातचेच ठरलेले आहेत. आणि ही सगळी कुंभमेळ्याची कामं गुजरातच्या ठेकेदाराला जाणार आहेत.
पालकमंत्र्यांशिवाय काही अडलंय का हे मुख्यमंत्री फडणवीस बरोबर म्हणाले. मुळात सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांच्यावाचूनही काही अडलेलं नाहिये. मंत्री कामच करत नाहियेत. मुख्यमंत्री नसले तरी काम सुरू आहेच. बाकीच्या ठिकाणी जे पालकमंत्री आहेत ते काय दिवे लावत आहेत ते बघून घ्या. अलीकडे पालकमंत्री हा जिल्ह्याची लुटूमार करायला आणि पोलिसांवर दबाव आणण्यासाठी नेमला जातो.
या राज्याचे पैसे लुटले कोणी? अजित पवार यांनी प्रायश्चित घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे. राज्याचे हे पैसे तुम्ही लुटू दिले. लाडक्या भावांनी नावं बदलून हजारो कोटी रुपयांचा लाभ घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला. हा लाभ तुम्ही घेऊ दिला, तुम्हाला मतं हवी होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली, त्याचे प्रायश्चित कोणी घेतले पाहिजे? असेही संजय राऊत म्हणाले.