शिवरायांचे राज्य इतके नपुंसक का झाले आहे? जैन मुनीच्या विधानावरून संजय राऊत यांचा संतप्त सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी ताराराणी या जैन समाजाच्या होत्या असे विधान केले होते. त्यावरून शिवरायांचे राज्य इतके नपुंसक का झाले आहे? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच हे लोक उद्या असेही सांगतील की मुंबई महाराष्ट्रासाठी मेलेले 106 हुतात्मे सुद्धा जैन होते! असाही दावा करतील असेही संजय राऊत म्हणाले.

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी एका कार्यक्रमात दावा केला की, ताराराणी या जैन होत्या, या जैन महाराणी यांनी औरंगजेबाचा नाश करण्यासाठी जन्म घेतला होता असे विधान केले होते. त्यावर संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, काय सुरू आहे महाराष्ट्रात? शिवरायांचे राज्य इतके नपुंसक का झाले आहे? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर सांगतात की महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! औरंगजेबाशी झुंज देणाऱ्या वीरांगना ताराराणींचे धर्मांतर करण्याचा अधिकार याना दिला कोणी? ताराराणी शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकल्या सुनबाई म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या धर्मपत्नी होत्या!
ताराराणीचे असे धर्मांतर सुरू असताना मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प बसले आहेत,का?कशासाठी? उद्या हे सांगतील आमच्या मुंबई महाराष्ट्रासाठी मेलेले 106 हुतात्मे सुद्धा जैन होते! यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री टाळ्या वाजवतील! असेही संजय राऊत म्हणाले.