आम्ही शेवटपर्यंत आशावादी; राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर संजय राऊत काय म्हणाले?

मराठी माणसाच्या एकत्रि‍करणासाठी आम्ही शेवटपर्यंत आशावादी आहोत. शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही या भूमिकेत राहू. ही मुंबई परप्रांतीय उद्योगपती गिळत असतील आणि त्याला भाजप, शिंदेसारखे लोक मदत करत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी, महाराष्ट्राभिमान्यांनी एकत्र यावे ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका कायम राहील, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले. यावेळी राऊत यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीनंतर मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याच्या प्रयत्नांना खिळ बसेल का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, मला असे वाटत नाही. फडणवीस हा विषय वेगळा आहे. फडणवीस हे गौतम अदानी किंवा मुंबईतील उद्योगपती, बिल्डर यांचे समर्थक आणि मुख्य हस्तक आहेत. आमची भूमिका मराठी माणसाला न्याय देण्याची आहे. मराठी माणूस मुंबईत टिकावा, मराठी माणसाला इथे त्याचे जे स्थान आहे ते आणि हक्क मिळावे ही भूमिका राज ठाकरे आणि आमचीही आहे. त्या भूमिकेतून एकत्र येण्याचा विचार राज ठाकरे यांनी मांडला आणि उद्धव ठाकरे यांना त्याला पाठिंबा दिला.

भाजप आणि त्याचे नेते हे मराठी माणूस, महाराष्ट्राचे शत्रू आहेत हे लोकांनी ठरवले आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस वेगळ्या विषयासंदर्भातही भेटले असू शकतात. मुंबईवर अदानींचे जे आक्रमण सुरू आहे त्या संदर्भात राज ठाकरे यांना काही सांगायचे असेल. ड्रीमलायनर विमानाच्या अपघातावरही त्यांनी काही भूमिका मांडली आहे, त्या संदर्भात भेटले असतील. त्यामुळे वेगळ्या शंका घेऊन मूळ मुद्द्यांना बगल देणे बरोबर नाही. राज ठाकरे आमचेच आहेत. पण फडणवीस, भाजप, शिंदे, शहांसारख्या नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्र आणि मराठी माणूस खतम करण्याचा विडा उचलाल आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात अनेकदा विधानसभा आणि लोकसभेप्रमाणे धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुकांचा निर्णय शक्यतो स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांच्या भूमिका काय आहेत त्यावरून घेतला जातो. शिवसेनाही अशा पद्धतीने निर्णय घेईल.

जगभरातील विमान वाहतूक क्षेत्राला कोडं पडलंय की एकाचवेळी दोन इंजिन बंद पडली कशी? – संजय राऊत

दरम्यान, शरद पवार गटातील आमदार निधी मिळत नाही आणि कामं होत नाहीत म्हणून अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, कामं होत नाहीत म्हणजे काय? शेकडो कोटीच्या निधीवाटपाचे फॅड अलीकडच्या काळातील आहे. तुम्ही उत्तम आमदार, लोकप्रतिनिधी असाल तर तुम्ही लोकांची कामं करू शकता. शिवसेनेचीही 20 आमदार आहेत. सत्ताधारी आमदारांना 200 कोटींची कामं मिळतात, पण आम्हाला नाही ही खंत आहे. पण तरीही ते लोकांमध्ये जात आहेत, लोक त्यांच्याबरोबर आहेत. ज्यांचे उद्योग, व्यवसाय, साखर कारखाने, सूत गिरण्या, दूध संघ, कृषी संस्था आहेत त्यांना निधीची चिंता जास्त असते. काँग्रेस आमदारांनीही कधी याबाबत खंत व्यक्त केल्याचे ऐकले नाही. आमच्या आमदारांना खंत आहे, पण आम्ही जमिनीवर काम करतो. तुम्ही निधी द्या किंवा नका देऊ, आम्हाला काम करायचेच आहे, असेही राऊत म्हणाले.