शिवसेनेवर अन्याय झाला, SC मध्ये न्याय व सत्याचा विजय होईल अशी अपेक्षा करतो! – संजय राऊत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी होणार आहे. याबाबत आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयात आम्ही न्याय आणि सत्याचा विजय होईल, अशी अपेक्षा करतो, असे राऊत म्हणाले.

पत्रकार परिषदे दरम्यान माध्यमांनी संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत विचारले. याला उत्तर देताना ते म्हणाले की, शिवसेनेवर अन्याय झाला आणि तो अन्याय कुणी केला? गृहमंत्री अमित शहा, देशाचे निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष. त्याच्यामुळे न्याय मागण्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयातच जावे लागले. मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या. पण तेही न्याय देऊ शकले नाहीत.

गद्दार मिंधे गटाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाणाचा वापर करण्यापासून रोखा, अशी विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाला केली आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, धनुष्यबाण बेकायदेशीरपणे शिंदे गटाला देण्यात आला. कुणी दिला तर निवडणूक आयोगाने दिला. निवडणूक आयोगाने आधार काय घेतला? तर पक्ष आधार घेतला नाही तर विधिमंडळातील बहुमत आधार घेतला.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी

विधिमंडळातील त्यातले काही आमदार पराभूत झाले. लोकसभेतील त्यांचे खासदार पराभूत झाले. ज्यांच्या आधारावर हे चिन्ह आणि पक्ष दिले, त्यातले बहुसंख्य लोक पराभूत झाले. मग तो आधार कुठे आहे? त्याच्यामुळे नव्याने सुनावणी होऊन पक्षाने चिन्ह गोठवण्याची मागणी केली. कारण त्याच्यावर त्यांचा काहीच अधिकार नाही. आम्ही न्याय आणि सत्य याचा विजय होईल अशी अपेक्षा करतो, असे राऊत म्हणाले.