नगरविकास खातं भ्रष्टाचाराचं सर्वात मोठं आगार, संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत पत्र लिहले आहे. त्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकार व नगरविकास खात्यावर जोरदार निशाणा साधला. ”नगरविकास खातं भ्रष्टाचाराचं सर्वात मोठं आगार आहे. माती, रेती, सिमें, डांबर, खडी या माध्यमातून भ्रष्टाचार होत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्रात महानगरपालिका, जिल्हा परिषदां निवडणूका होत नसल्याने प्रशासक नेमले आहेत. त्या नगरपालिका व स्थानिक स्वराज्या संस्थांमध्ये सरकारी पैशाची लुटमार सुरू आहे. आमचे नगरचे शहरप्रमुख किरण काळे मला भेटले होते. त्यांनी अहिल्यानगर महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे असे सांगितले. त्याविरोधात किरण काळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे, स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केल्या मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आज मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे. अहिल्यानगरमध्ये 776 रस्त्यांच्या कामावर साडे तीनशे कोटी खर्च झाले आहेत. मात्र अहिल्यानगरमध्ये रस्ते शोधावे लागत आहेत. लोकांना रस्ते नाहीत. भ्रष्टाचार झालाय. तो करणारे लोकप्रतिनिधी आमदार तुमच्या पक्षात आहेत. हा सुद्धा जनसुरक्षेचा मुद्दा आहे, हा सुद्धा अर्बन नक्षलवादच आहे. महाराष्ट्रातील 27 महापालिकांमध्ये लाखो कोटींचा भ्रष्टाचार सुरू आहेय. सरकार नाकाने कांदे सोलतंय व त्याचं नेतृत्व आमचे मुख्यमंत्री करत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

अहिल्यानगर महानगरपालिका दरोडेखोरीचं उत्तर उदाहरण आहे. अहिल्यानगरमधील 776 रस्त्यांचा भ्रष्टाचार नगरविकास खात्याशी संबंधित आहे. साडे तीनशे कोटी रस्त्याचे खाल्लेले आहेत. रस्ते नाहीत पण पैसे खर्च झाले गेले आहेत. नगरविकास खातं भ्रष्टाचाराचं सर्वात मोठं आगार आहे. माती रेती, सिंमेंट डांबर खडी या माध्यमातून भ्रष्टाचार होतोय, असेही ते म्हणाले.

”तेलंगणाची जी सोळा गावं राज्यात समाविष्ट करताय त्यासाठी आपले आभारी आहोत. या सोबत फडणवीसांनी सीमाभागातील 672 गावांचा विषय देखील संपवावा. जी गावं कर्नाटकात जबरदस्तीने घातली आहे. तिकडची 22 लाख जनता महारााष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करत आहेत. तिथल्या मराठी माणसावर अन्याय होत आहे. तिथे कन्नड सक्तीसाठी अत्याचार सुरू आहेत. त्या सीमाभागाबाबत पंतप्रधान, गृहमंत्र्यासोबत बैठक घेणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे त्या भागाची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना आदेश दिले पाहिजे की बेळगावात जा व तिथे जी सक्ती सुरू आहे तिथल्या आंदोलनात सहभागी व्हा. केंद्रावर प्रचंड वजन असलेले एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याकडून हे काम करून घेतलं पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

शंभूराज देसाई सरकारी पैशाने त्यांचे वडील शिवाजीराव देसाई यांचे स्मारक बांधत आहेत त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, सरकारी पैशाने शंभूराज देसाई त्यांच्या वडिलांचे स्मारक बांधत आहेत. आपल्या पिताश्रींनी काय महान कार्य केलं आहे हे महाराष्ट्राला कळू द्या. शिवाजीराव देसाई कोण त्यांचं कार्य काय हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.