
पावसामुळे धरण आणि धबधब्यांवरील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पर्यटक वाहून गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी शहापुरातील पर्यटनस्थळे, धबधबे व धरणांवर जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. 29 मे ते 25 जुलैपर्यंत ही बंदी सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
शहापुरात भातसा, तानसा, वैतरणा धरण, आजा पर्वत, सापगाव, डोळखांबचे डोंगर, दहिगाव, माहुली धबधबा, अशोका धबधबा यांसह अनेक पर्यटनस्थळे आहेत. पावसाळ्यात या ठिकाणांवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकमधील पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. मात्र दरवर्षी घडणाऱ्या दुर्घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या पर्यटनस्थळावर जाण्यास बंदी घातली आहे. या बंदीमुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
कोट्यवधी खर्च करूनही बंदी का?
पर्यटनास वाव मिळावा यासाठी पर्यटन विकास अंतर्गत निधीच्या माध्यमातून धबधबे आणि धरण, तलाव, नदी क्षेत्र परिसरात सुशोभीकरण करण्यात आले आहे. मात्र कोट्यवधी रुपये खर्च करून त्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या नसतील तर त्या सुशोभीकरणाचा फायदा काय, असा प्रश्न संतप्त पर्यटकांनी केला आहे. दरम्यान या बंदीमुळे स्थानिकांचा पावसाळ्यातील रोजगार पूर्णपणे बंद होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे.