
भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱया कुरघोडय़ांना संयमाने आणि निर्णायक उत्तर देणे ही भारताची जबाबदारी आहे आणि भारताने ती जागतिक शांततेच्या भानासह पार पाडली आहे. भारत हा नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक राहिला आहे. आणि त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर ते स्वागतार्ह आहे, मात्र दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलणे हेदेखील आंतरराष्ट्रीय समुदायाचे सामूहिक कर्तव्य आहे. शांतीच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढय़ाचं बळ वाढवते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.