बोरिवली – ठाणे टनेल प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाची हमी द्या, शिवसेनेची MMRDA कडे मागणी

एमएमआरडीएच्या बोरिवली – ठाणे ट्विन टनेल प्रकल्पाच्या परिसरातील काही एसआरए प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. मागाठाणे येथील या झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी आता काही विकासक पुढे आले आहेत. मात्र, हे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन रहिवाशांना हक्काची घर देण्याची हमी एमएमआरडीएने द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून एमएमआरडीए आयुक्तांकडे करण्यात आली.

आधीचा अनुभव पाहता रहिवाशांचा एसआरए आणि विकासकांवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे वेळेत घर आणि भाडे मिळवून देण्याची हमी एमएमआरडीएने द्यावी, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या मागणीला संजय मुखर्जी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एमएमआरडीएकडे उपलब्ध असलेल्या पीएपी घरांची माहिती देऊन कायमस्वरूपी देण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली.

एमएमआरडीएकडून बोरिवली – ठाणे ट्विन टनेल प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे मागाठाणे येथील रुपवते नगर, फरलेवाडी – त्रिमूर्ती देवीपाडा आणि 90 फूट रोडवरील 572 रहिवाशी बाधित होणार आहे. या प्रकल्पाच्या काही भागात त्रिमूर्ती देवीपाडा (डिझर्व लॅण्ड डेव्हलपर्स), महाकाली एसआरए (पूर्वीचे विकासक – सोहम डेव्हलपर्स) , देवीपाडा एसआरए सोसायटी (आशापूरा, ए अॅण्ड ओ डेव्हलपर्स, दोस्ती डेव्हलपर्स) असे तीन एसआरए प्रकल्प 4 ते 7 वर्षांपासून रखडलेले आहेत. विकासकांनी या रहिवाशांचे कोट्यवधी रुपयांचे भाडे देखील थकवले आहे. यातील महाकाली एसआरए प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोहित कंबोज यांच्या अॅस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर प्रा. लि. या कंपनीने प्रस्ताव पाठवला आहे.

या बैठकीला माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागसंघटक शुभदा शिंदे, विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, वैभवी तावडे, हनुमंत मोरे, अभिलाष कोंडविलकर, माधुरी खानविलकर, तुकाराम पालव, नंदकुमार मोरे, रोहिणी चौगुले यांच्यासह या प्रकल्पामुळे बाधित झालेले रहिवाशी उपस्थित होते.