मराठवाड्यात ठिकठिकाणी चक्का जाम

निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, ‘क्या हुआ तेरा वादा?’ असा खणखणीत सवाल करत जनतेची फसवणूक करून गाढ झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी गुरुवारी मराठवाडय़ात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या.

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप, मिंधे आणि अजितदादा गटाने बेफाम आश्वासनांची खिरापत वाटली होती. शेतकऱयांना संपूर्ण कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतमालाला हमीभाव, लाडक्या भावांना रोजगार असे मृगजळ दाखवून महायुतीने जनतेकडून मते घेतली. परंतु, सत्ता हाती येताच महायुतीने मते देणाऱया जनतेला लाथाडले. महायुतीला त्यांनीच दिलेल्या आश्वासनांची जाणीव करून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘क्या हुआ तेरा वादा?’ हे आंदोलन करण्यात आले. गुरुवारी चक्काजामने या आंदोलनाचा समारोप झाला.

नांदेड जिल्हय़ात महादेव पिंपळगाव येथे सकाळीच चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे अर्धापूर -नांदेड मार्गावरील वाहतूक खोळंबली. तर हिंगोलीत वाशीम महामार्गावर बासंबा फाटय़ावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शिवसैनिक रस्त्यावर ठाण मांडून बसल्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. महायुतीने निवडणूक प्रचारात दिलेल्या सर्व आश्वासनांची तत्काळ पूर्तता करावी, अशी मागणी करत लातूर येथे छत्रपती चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. धाराशिव येथे धुळे-सोलापूर महामार्गावर सर्किट हाऊससमोरील चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  बीड येथेही धुळे-सोलापूर महामार्ग शिवसैनिकांनी रोखून धरला. यावेळी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

बीड येथे अण्णाभाऊ साठे चौकात चक्काजाम आंदोलन करून शिवसैनिकांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार अमरसिंह पंडित यांच्या घरावर धडक मारली. शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. आमदार पंडित यांची शिवसैनिकांचे निवेदन घेण्यासाठी बाहेर येण्याची हिंमतच झाली नाही. शेवटी त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांचे निवेदन घेतले.