
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची सत्ता मिळताच पूर्तता न करता जनतेला वार्यावर सोडणार्या महायुतीला क्या हुआ तेरा वादा? असा खणखणीत सवाल करत शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगरातील महावीर चौकात (बाबा पेट्रोलपंप) चक्काजाम आंदोलन करण्यात आले. चौकातील चारही रस्त्यावर शिवसैनिकांसह रणरागिणींनी ठाण मांडून वाहतूक ठप्प केली. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करीत चौक दणाणून सोडला. सुमारे एकतास वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या वतीने आश्वासनांची खैरात वाटण्यात आली होती. मात्र सत्ता मिळल्यानंतर महायुती सरकारला या आश्वासनांचा विसर पडला. दिलेला कोणताही शब्द पाळण्यात आला नाही. महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांचे काय झाले. असा जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने 5 ते 12 जून दरम्यान क्या हुआ तेरा वादा? हे अभिनव आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज गुरुवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहरातील बाबा पेट्रोलपंपाजवळील महावीर चौकात शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलनाला सुरूवात झाली. या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवसैनिकांनी चारही रस्त्यावर बैठक मारली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. क्या हुआ तेरा वादा? महायुती सरकारचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय, सोयबीनला भाव मिळालाच पाहिजे, शेतकर्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, देत कशी नाही दिलीच पाहिजे, लाडक्या बहिणींना फसविणार्या महायुती सरकारचा धिक्कार असो, लाडक्या बहिणींना सुरक्षा मिळालीच पाहिजे, लाडक्या बहिणींचे अनुदान 1500 वरून 2100 रुपये झालेच पाहिजे, शेतकर्यांना मोफत खते, बियाणे मिळालेच पाहिजे, फडणवीस सरकार हाय-हाय, महायुती सरकार मुर्दाबाद या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. प्रत्येक शिवसैनिकांच्या हातात देण्यात आलेले पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाची जंत्रीच शिवसैनिकांनी नागरिकांच्या लक्षात आणून दिली. शिवसैनिकांनी रुग्णवाहिकेला जाण्यासाठी मात्र रस्ता मोकळा करून दिला. शिवसैनिक आक्रमक होताच पोलीसांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेतले.
वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा
शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन सुरू होताच महावीर चौकात चारही रस्त्यावर शिवसैनिकांनी ठाण मांडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. दुचाकीसह चारचाकी वाहने, बसेस, ट्रक, मिनी ट्रक या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नगरनाका चौकपासून ते महावीर चौक आणि जिल्हा न्यायालय ते महावीर चौक अशा एक किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.
या चक्काजाम आंदोलनात महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख दिग्वीजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, किसान जिल्हा संघटक नानासाहेब पळसकर, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, विजय वाघमारे, संतोष खेंडके, अशोक शिंदे, अरविंद धिवर, अनिल चोरडिया, शंकर ठोंबरे, आनंद भालेकर, विष्णू जाधव, चंद्रकांत गवई, बापू पवार, प्रकाश कमलानी, राजू दानवे, नंदू लबडे, जयसिंग होलिये, शहर संघटक सचिन तायडे, सचिन वाघ, संजय पवार, संदेश कवडे, सुगंधकुमार गडवे, गणेश नवले, अजय चोपडे, अनिल लहाने, प्रमोद ठेंगडे, गणेश लोखंडे, संजय हरणे, नितीन पवार, सुरेश गायके, दिनेश राजेभोसले, संतोष बोरसे, संजीवन सरोदे, सुनील कडवे, सागर निकम, धांडे, दलीत आघाडीचे शहर संघटक वैजीनाथ म्हस्के, अल्पसंख्याक आघाडी शहर संघटक शेख आसिफ, उपशहर संघटक मधुकर घोरपडे, सुंदर साळवे, माणिक पगडे, सुभाष आठवले, सलीम खामगावकर, आदिक, महिला आघाडीच्या संपर्क संघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनीता देव, दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, माजी जि. प. अध्यक्षा लता पगारे, शहर संघटक अॅड. सुनीता औताडे, सुनीता सोनावणे, मीरा देशपांडे, सुमित्रा हाळनोर, अॅड, अंजना गवई, अरुणा भाटी, भागुअक्का शिरसाट, मीना थोरवे विजया पवार, वंदना कुलकर्णी, छाया देवराज, अनिता दहाडिया, संगिता बनकर, मनिषा बिराजदार, रंजना आहेर, रंजना कोलते, कविता मठपती, लता शंकपाळ, मंगल डोंगरे, प्र्रतिभा राजपूत, अर्चना काथार, शोभा साबळे, नुसरत जहाँ, मंगला घाडगे, प्रज्ञा जठार, अनिता लगड, पंचफुला काळे, कल्पना मुळे आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते.