हक्काची जागा सोडून कुर्ल्यात जाणार नाही! एल्फिन्स्टन पूलबाधित रहिवाशी आक्रमक, शिवसेनेच्या स्वाक्षरी मोहिमेला प्रचंड प्रतिसाद

एल्फिन्स्टन पूल प्रकल्पबाधितांचे परळ, वरळी परिसरातच पुनर्वसन करण्याची जोरदार मागणी करीत शिवसेनेने सोमवारी स्वाक्षरी मोहीम घेतली आणि सरकारविरोधात आक्रमक भूमिका मांडली. सरकारने रहिवाशांना कुर्ल्यातील संक्रमण शिबिरात जाण्याचा पर्याय दिला आहे. तो रहिवाशांनी धुडकावला. शिवसेनेच्या स्वाक्षरी मोहिमेला रहिवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

स्थानिक रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर गोलमाल भूमिका घेऊन एल्फिन्स्टन पूल पाडण्याचे कारस्थान सरकारने रचले आहे. त्याला प्रखर विरोध करीत शिवसेनेने सोमवारी स्वाक्षरी मोहीम राबवली. यावेळी विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, आमदार अजय चौधरी, शिवसेना सचिव सुधीर साळवी, साईनाथ दुर्गे, सूरज चव्हाण, माजी महापौर श्रद्धा जाधव, नगरसेविका प्रीती पाटणकर आदी उपस्थित होते. स्थानिक आमदार महेश सावंत यांनी एल्फिन्स्टन पूल बंदविरोधातील स्वाक्षरी मोहिमेत प्रथम स्वाक्षरी केली. त्यानंतर विभागातील शेकडो नागरिकांनी स्वाक्षरी करून सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. यावेळी जनतेला एकजुटीने लढा देण्याचे आवाहन करतानाच आमदार महेश सावंत यांनी स्थानिकांच्या सोबत शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचा आधार दिला. इथल्या काही इमारतींना त्या धोकादायक असल्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. या इमारती जमीनदोस्त करण्याचे सरकारचे हे षड्यंत्र आहे. सरकारचा कुटील डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल

पिढय़ान् पिढय़ा आम्ही याच विभागात राहतोय. आमच्या मुलांच्या शाळा, कॉलेज याच विभागात आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही कुर्ल्यातील संक्रमण शिबिरात राहायला जाणार नाही. आम्हाला महिना 45 हजार रुपये भाडे द्या किंवा दादर, वरळी परिसरातच तात्पुरती संक्रमण शिबिरे द्या, अशी मागणी एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या इमारतीमधील रहिवाशांनी केली आहे. आमच्या मागण्यांबाबत ठोस तोडगा निघत नाही तोपर्यंत एल्फिन्स्टन पूल तोडू नये. अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा रहिवाशांनी दिला.

मूळ मुंबईकरांना उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र हाणून पाडू

मूळ मुंबईकरांना उद्ध्वस्त करण्याचे सरकारचे षड्यंत्र आहे. ते आम्ही हाणून पाडू, आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. स्थानिकांचे याच परिसरात पुनर्वसन झाल्याशिवाय एल्फिन्स्टन पूल पाडूच देणार नाही, असा इशारा यावेळी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी यावेळी दिला.

अदानीला मुंबईतील जागा कशा आंदण दिल्या जातात?

अदानीला मुंबईतील जागा कशा आंदण दिल्या जातात? मुलुंडमधील मिठागरची जागा, देवनार डम्पिंग ग्राऊंडची जागा.. एकेक जागा अदानीच्या घशात घातल्या जाताहेत. अदानी सरकार चालवतोय का? सरकारचे ’हम करे सो कायदा’ खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार अजय चौधरी यांनी दिला.

प्रशासन आंधळे झालेय का?

n एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम सुरू करण्याआधी लोकांची गैरसोय विचारातच घेतली नाहीय.
n आम्ही वेळोवेळी आंदोलन करतोय. प्रशासन आंधळे झाले आहे का, असा संतप्त सवाल माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केला.

पोद्दार, कामगार रुग्णालयात ओपीडी, आयसीयू सुरू करा

सरकारने एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाचा घाट घालण्याआधी रुग्णांचे होणारे हाल विचारात घेतलेले नाहीत. परळ परिसरात मोठी रुग्णालये आहेत. पूल बंद केल्यानंतर वरळी, प्रभादेवीतील रुग्णांचे प्रचंड हाल होतील. त्यामुळे आधी वरळीतील पोद्दार आणि कामगार रुग्णालयात ओपीडी व आयसीयू युनिट सुरु करा, अशी आग्रही मागणी आमदार महेश सावंत यांनी केली.