
ठाणे महापालिका हद्दीतील मुंब्रा आणि दिव्यात छुप्या पद्धतीने सुरू झालेल्या बेकायदा डम्पिंगच्या दुर्गंधीने नागरिक आधीच हैराण झाले आहेत. असे असताना मुंबईच्या मिठी नदीतून निघणारा गाळ मुंब्या, दिव्यात टाकण्याचा निर्णय प्रशासकीय स्तरावर घेण्यात आला आहे. या निर्णयाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कडाडून विरोध केला आहे. मिठीचा गाळ मुंब्रा, दिव्यात टाकला तर उद्रेक होईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे.
मिठी नदीचा गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली. गाळ बाजूला काढल्यानंतर तो पूर्णपणे सुकला की त्याची नोंद करून डंपरद्वारे महापे येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जात होता. मात्र गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाने महापे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचून दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे डंपरचालक गाळ नेण्यास टाळाटाळ करत आहेत. अशात मिठीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर गाळ पडून आहे. मोठ्या पावसाला सुरुवात झाल्यास हाही गाळ पुन्हा नदीत वाहून जाण्याची भीती आहे. त्यामुळे त्याची तत्काळ विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याने प्रशासनाने ठाणे महापालिका हद्दीतील मुंब्रा किंवा दिवा येथे जागेची निवड केली आहे. याला विरोध करीत शिवसेना दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देत हरकत घेतली आहे.
अधिकारी संभ्रमावस्थेत
मिठी नदीच्या गाळामुळे मुंब्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. हा गाळ नेमका कुठे टाकणार याबाबत ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनाही माहिती नाही. त्यामुळे अधिकारीदेखील संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात मिठी नदीच्या गाळावरून ठाण्यात राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागरिकांच्या भावनांचा विचार करून येथे गाळ टाकू नका
दिवा शहरात अगोदरच छुप्या पद्धतीने अनधिकृत डम्पिंगच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात मुंबईतील मिठी नदीचा गाळ येथे टाकल्यास दिवा शहरातील नागरिकांच्या रागाचा उद्रेक होईल. तरी प्रशासनाला विनंती आहे की नागरिकांच्या भावनांचा विचार करून हा गाळ येथे टाकू नका, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शहरप्रमुख सचिन पाटील यांनी दिला आहे.