‘मेघा’साठी राज्याने नियम डावलले, कोट्यावधींचा घोटाळा केला, घोटाळेबाज मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार; संजय राऊत यांचा सवाल

सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकल्पाबाबत निर्णय देत राज्यातील मोठा घोटाळा उघड केला आहे, याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. तसेच घोटाळा आणि भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, अशी घोषणा करणारे फडणवीस या संबंधित खात्याच्या मंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार, असा सवालही संजय राऊत यांनी केला.

एका प्रकल्पातून संबंधित खात्याचा मंत्री 3 हजार कोटी रुपये मिळवतो, ही राज्याची लूट आहे. मेघा इंजिनीअरिंग कंपनीने निवडणुकीपूर्वी भाजपला इलेक्ट्रोरल बॉण्डद्वारे हजारो कोटी रुपये दिले होते. त्यांनी भाजपला सर्वाधिक निधी दिला होता. याच कंपनीने मिंधे यांनाही शेकडो कोटी निवडणुकीपुर्वी दिले होते. त्याच पैशांच्या जोरावर आमदार, खासदार आणि यंत्रणा विकत घेत निवडणुका जिंकण्यात आल्या. त्याची परतफेड म्हणून 14 हजार कोटींचे टेंडर देण्यात आले. हे मेघा इंजिनीअरिंग प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि न्यायालयाने राज्यातील भष्टाचार देशासमोर आणला आहे. या भ्रष्टाचारप्रकरणी संबंधित खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा होता.

हा मोठा भ्रष्टाचार आहे. मेघा इंजिनीअरिंगकडून निवडणुकीपुर्वी हजारो कोटी रुपये घेण्यात आले. आता त्यांना नियमबाह्य पद्धतीने कंत्राटे देण्यात येत आहेत. फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात तुरुंगात जाण्यासाठी योग्य असे अनेक नेते आहेत. मात्र, त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही. तसेच प्रशासनातील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असे फडणवीस सांगत आहेत. मात्र, त्यांच्या मंत्रिमंडळातच अनेक भ्रष्टाचारी आहेत. राज्यात याआधाही काही आरोप असलेल्या मंत्र्यांचे राजीनामे काँग्रेसने घेतले होते. राज्याची ती पंरपरा आहे. मात्र, फडणवीस फक्त घोषणा करत आहेत. कारवाई काहीही होत नाही, असेही संजय राऊत म्हणाले. धुळ्यात अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या खासगी सचिवांकडे सापडलेल्या रोकडप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. तरीही भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या फक्त घोषणा करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.