
मुंबईसह राज्यात या वर्षी पावसाने 15 दिवस आधीच दमदार हजेरी लावत सगळ्यांना सुखद धक्का दिला. हजेरी लावून पाऊस गायब होईल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच हजेरीनंतरही पावसाने मुसळधार बरसणे सुरूच ठेवले. या पार्श्वभूमीवर मुंबईत कमी कालावधीत अतिष्टी होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत 2014 पासून बरसलेल्या पावसाच्या आकडेवारीतून हा निष्कर्ष काढला असून यात चार तासांत तब्बल 28 वेळा अतिवृष्टी झाली आहे, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.
या वर्षी मुंबईत 26 मेपासून पावसाने हजेरी लावली. गेल्या 20 दिवसांत मुंबईला पावसाने दणका दिला आहे. या काळात झालेल्या मुसळधार पावसाने रस्ते, लोकल वाहतूकही विस्कळीत झाली. मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी तुंबण्याचे आणि पाणी तुंबण्याची नवीन ठिकाणे तयार झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने अॅटोमॅटिक वेदर सिस्टम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुंबईच्या गेल्या दहा वर्षांतील पावसाची आकडेवारी मांडली आहे. या आकडेवारीतून मुंबईत कमी कालावधीत झालेल्या अतिवृष्टीचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
…म्हणून मुंबईत पाणी तुंबते
मुंबईत कमी कालावधीत पाऊस पडण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे अनेक उपाययोजना करूनही मुंबईत पाणी तुंबण्याच्या घटना घडत आहेत, असा दावा एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने केला आहे.
दहा वर्षांतील आकडेवारी
मुंबईत 2014 ते 2018 या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला तेव्हा एक दिवसातील सरासरी पावसाचे प्रमाण 131 मिमी इतके होते. मात्र, 2019 ते 2024 या कालखंडात हे प्रमाण वाढून 182 मिमी इतके झाले. विशेष म्हणजे 25 जुलै 2024 रोजी मुंबईत 267 मिमी पावसाची नोंद झाली होती.