
आधी अभद्र युती केल्यानंतर आता काँग्रेसने निलंबित केलेले १२ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत एका कार्यक्रमात या नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. १२ नगरसेवकांसोबतच काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीप पाटील यांना निलंबित केले असून संपूर्ण ब्लॉक कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र पक्षाकडून प्रदीप पाटील यांना देण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेसने एक पत्रक काढत या नगरसेवकांना पक्षातून निलंबित केलं. या पत्रात म्हटले आहे की, आपण अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली असून आपल्या पक्षाचे बारा सदस्य निवडून आले आहेत. मात्र, आपण प्रदेश कार्यालयास कोणतीही माहिती न देता अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन केल्याचे प्रसार माध्यमांद्वारे कळाले. ही बाब अत्यंत चुकीची असून पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे. ही बाब लक्षात घेता प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून आपणास काँग्रेस पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे. तसेच आपली ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे आपल्यासोबत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांना सुध्दा पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे.































































