
खेळाप्रमाणे राजकरणात देखील टीमवर्क गरजेचं आहे, असं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त बालेवाडी येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “बालेवाडी येथे क्रीडा महोत्सवात अनेक खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे. माझं वाढदिवस हे निमित्त आहे. मात्र मला वाटतं जून, जुलै महिन्यात आपण पाहतो. माझा वाढदिवस असेल, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असेल, तसेच जानेवारीत माझे आजोबा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस असेल. माझ्या आजोबांनी अनेक वर्ष सांगितलं आहे. पक्ष कशासाठी आहे आहेत, तर 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकरण यासाठी. 80 टक्के समाजकारणात मोठा वाटा हा खेळाचा आहे. राजकारणाचे खेळ आपले वेगळे असतात, ते चालूच राहतात.”
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “कुठच्याही कार्यक्रमामध्ये आणि खासकरून खेळाच्या कार्यक्रमात मी एकच प्रेरणा घेतो, ती म्हणजे टीमवर्क. बॅडमिंटन सारखा खेळ तुम्ही एकटे खेळाला, डबल असेल किंवा सिंगल असेल. तुम्ही एकटे खेळता. पण तुम्ही एकटे जेव्हा खेळत असता तेव्हा तुमच्या मागे मोठं टीमवर्क असतं. तुमचे कोच असतात, तुमचे कुटुंबीय असतात. तुमचे फॅन्स असतात. टीमवर्क प्रत्येक ठिकाणी गरजेचं असतं. तसेच राजकरणात देखील टीमवर्क गरजेचं आहे.”