
मंदिरात दर्शनापूर्वी गोदावरी नदीत पवित्र स्नानासाठी गेलेले पाच तरुण बुडाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पाचही तरुण एकाच कुटुंबातील होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने सर्व मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत.
मूळचे राजस्थानचे रहिवासी असलेले पीडित कुटुंब सध्या हैदराबादमधील चिंतल येथे वास्तव्यास आहे. एकाच कुटुंबातील 18 सदस्य रविवारी तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील मंदिर नगरी बसर येथे दर्शन आणि पवित्र स्नानासाठी गेले होते. दर्शनापूर्वी पाच तरुण धार्मिक विधीसाठी नदीवर गेले. तेथे पवित्र स्नान करताना तरुण खोल पाण्यात गेले आणि बुडाले.
कुटुंबीयांनी आरडाओरडा करताच स्थानिकांनी धाव घेतली. स्थानिकांनी तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो व्यर्थ ठरला. पाचही तरुणांचा बुडून मृत्यू झाला. राकेश, विनोद, मदन, रुतिक आणि भरत अशी मृतांची नावे आहेत, हे सर्व 20 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. सर्व मृतदेह भैंसा येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.