रामदास बोट ते तुळजाई.. 100 वर्षांत शेकडोजणांचा बळी; उरण-रेवसच्या समुद्रात ‘बर्म्युडा ट्रॅगल’, कासा खडक ब्लॅक स्पॉट

>> मधुकर ठाकूर

26 जुलै रोजी तुळजाई बोट कासा खडकाजवळ उलटून तीन खलाशांचा बळी गेला. मात्र याच ठिकाणी 17 जुलै 1947 रोजी रामदास बोट दुर्घटनेत तब्बल 700 प्रवाशांचा बळी गेला होता. आश्चर्य म्हणजे याच खडकाच्या परिसरात आतापर्यंत अनेक लहान मोठ्या बोट दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे कासाचा खडक बोटींच्या अपघांतामुळे ब्लॅक स्पॉट बनला असून उरणच्या समुद्रातील या ‘बर्म्युडा ट्रॅगल’ जवळून जाताना मच्छीमार तसेच अन्य बोटींतील प्रवाशांचा अक्षरशः थरकाप उडत आहे.

उरण-रेवसदरम्यानच्या समुद्र खाडीतील कासा खडक मागील 95 वर्षांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे. या सागरी मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटींना झालेल्या अपघातामुळे शेकडो लोकांना जलसमाधी मिळाल्याने मच्छीमार व सागरी प्रवाशांसाठी हा खडक यमदूत बनला आहे. 26 जुलै रोजी तुळजाई ही मासेमारी बोट डागडुजीसाठी करंजा बंदराकडे निघाली होती. मात्र कासा खडकाजवळ जाताच या बोटीचे इंजिन अचानक बंद पडल्याने बोट सासवण किनाऱ्यावर बुडाली. यात आठपैकी तीन खलाशी बुडाले. त्यामुळे 17 जुलै 1947 साली याच सागरी मार्गावर घडलेल्या रामदास बोटीच्या अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या.

अपघातांचा घटनाक्रम

406 टन वजनाची असलेली रामदास बोट वादळी वाऱ्याचा सामना करण्यासाठी सुसज्ज होती. मात्र कासा खडकावर आदळल्याने रामदास बोट फुटली. या दुर्घटनेआधी कासा खडक परिसरात 11 नोव्हेंबर 1927 रोजी एकाच दिवशी एस. एस. जयंती आणि एस. एस. तुकाराम या दोन प्रवासी बोटी बुडाल्या होत्या. या अपघातात जयंती प्रवासी बोटीतील 96 तर तुकाराम बोटीतील 143 प्रवाशांपैकी 74 प्रवाशांना जलसमाधी मिळाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर मागील 75 वर्षांत या कासा खडकाजवळ छोट्या मोठ्या बोटींचे अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत. यामुळे उरण-रेवस समुद्रातील कासा खडक परिसर मच्छीमार व सागरी प्रवाशांसाठी एकप्रकारे यमदूत बनला आहे.

अनेकांना नेमकी का वाटते भीती?

अटलांटिक महासागरातील ‘बर्म्युडा ट्रॅगल’चे नाव काढले की अनेकांना घाम फुटतो. याठिकाणी अनेक मोठी जहाजे आणि विमाने गायब झाल्याचे सांगितले जाते. असला काही प्रकार उरणच्या समुद्रात घडत नसला तरी कासा खडकाजवळ आतापर्यंत अनेक बोट उलटून शेकडोजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भागात अचानक वातावरण बदलून वादळ निर्माण होत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. 1947 मध्येही केवळ दहा वर्षे झालेली मजबूत रामदास बोट कासा खडकाजवळ उलटून सातशे लोकांचा बळी गेला होता. त्यामुळे या भागातून प्रवास करताना प्रवासी, पर्यटक तसेच मच्छीमारांना भीती वाटत असून कधी काय होईल हे सांगता येत नाही असे अनेकांचे म्हणणे आहे.