मुंबईसह ठाणे, रायगडला अवकाळी पावसाचा इशारा; इतर जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवार, १ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास मुंबईत पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याकडून शहरात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, रायगड आणि इतर जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेने किमान तापमान २५.५ अंश सेल्सिअस नोंदवले, तर IMD च्या सांताक्रूझ वेधशाळेने मंगळवारी २५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले; यावेळी हवामान कोरडे होते आणि आकाश निरभ्र होते.

नरिमन पॉईंट आणि मरिन ड्राइव्हसह समुद्रकिनारी असलेल्या भागात ढगाळ आकाश आणि गार वाऱ्याची झुळूक अनुभवता आली. यावेळी तापमान २६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर हवेच्या गुणवत्तेत थोडी सुधारणा झाली आहे.

हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी ४०-५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे.