
भाजपशासित बिहार, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील लोकांची नावं पश्चिम बंगालच्या मतदार यादीत घुसवून निकाल फिरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
पश्चिम मदिनापूरच्या उमेदवार चंद्रकोना बॅनर्जी यांच्या प्रचारसभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपला फटकारले आहे. ”अभिषेक बॅनर्जीने मला कालच सांगितले की त्याला याबाबत माहिती मिळाली आहे. एकाच दिवसात निवडणूक आयोगाकडे 30 हजाराहून अधिक नवीन मतदारांच्या नावांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर अभिषेक त्याचा प्रचार सोडून निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेला होता”, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
२९४ जागांवर मीच उमेदवार
तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी एक भावनिक आवाहन केले. “तुमच्या मतदारसंघातील उमेदवार कोण आहे, हे पाहू नका. राज्यातील सर्व २९४ विधानसभा जागांवर मीच उमेदवार आहे, असे समजून तृणमूल काँग्रेसला मतदान करा,” असे आवाहन बॅनर्जी यांनी यावेळी केले.





























































