रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करण्याचे महत्त्व, वाचा सविस्तर

शतपावली म्हणजेच जेवणानंतर काही काळ चालणे. खासकरुन रात्रीच्या जेवणानंतर काही काळ चालल्यामुळे, आपले आरोग्य उत्तम राहते. फार पूर्वीपासून जुनी जाणती माणसं आपल्याला जेवणानंतर लगेच झोपू नये असं सांगत असे. या सांगण्यात तथ्य होतं. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपल्यामुळे आपण अनेक आजारांना आमंत्रण देत आहोत. सध्याच्या घडीला जेवणानंतर शतपावली करण्याची प्रथा ही खरोखरच बंद झाल्यातच जमा आहे. चला तर आपण पाहुया, शतपावली करण्याचे फायदे.

स्पर्धेच्या या युगात आपल्या घरी जाण्या-येण्याच्या वेळाच बदलल्या आणि तिथेचे आपल्या सवयीही बदलल्या. म्हणूनच शतपावली म्हणजे काय असा अनेकांना प्रश्न पडतो. शतपावली म्हणजे जेवणानंतर काही काळ चालणे. त्यालाच शतपावली असे म्हणतात. म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर किमान शतपावली म्हणजे शंभर पावले चालणे हे खूपच गरजेचे आहे.

शतपावली करण्याचे फायदे

रात्रीच्या जेवणानंतर चालणे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. जेवणानंतर चालल्यामुळे आपल्या अंतर्गत अवयवांसाठी चांगले कार्य करते. एक मजबूत प्रतिकारशक्ती फ्लू, सर्दी आणि इतर अनेक गंभीर आजारांपासून वाचवू शकते.

रात्रीच्या जेवणानंतर चालण्यामुळे रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये अंतर राहते. तसेच मुख्य म्हणजे आपली पचनशक्ती सुधारते. रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाण्यामुळे आपली पाचन प्रणाली निरोगी राहते. पोटाशी संबंधित इतर कोणत्याही समस्येपासून आराम मिळतो.

तुम्हाला तुमचे चयापचय वाढवायचे असेल तर तुम्ही जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी फिरायला जा. रात्रीच्या जेवणानंतर चालून तुम्ही वजन कमी करू शकता.

तुम्हाला तणाव जाणवत असेल तर चालणे खूप फायदेशीर आहे कारण यामुळे तुमच्या शरीरातील एंडोर्फिन बाहेर पडून तणाव कमी होतो. हे आपल्याला चांगले वाटण्यासाठी आणि आपला मूड सुधारण्यासाठी कार्य करते. अशा प्रकारे, रात्रीच्या जेवणानंतर चालणे तुम्हाला ताण कमी करण्यास आणि तुम्हाला आनंदी करण्यास मदत करेल.