
मान्सूनपूर्व पाऊस मुंबईसह मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात बरसत असताना मुंबई आणि पूर्व उपनगरात मात्र येत्या बुधवारी, 28 मे रोजी 15 टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. पांजरापूर उदंचन केंद्रात नवीन टाकी बसवण्यात येणार असल्यामुळे ही पाणीकपात करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेने दिली.
मुंबई महापालिका तसेच ठाणे, भिवंडी, निजामपूर महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर येथील उदंचन केंद्रामधील टप्पा क्रमांक 1 येथे नवीन दाबवाढ नियंत्रण टाकी (ऑण्टिसर्ज व्हेसल) कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम बुधवारी, 28 मे रोजी सकाळी 9.45 पासून रात्री 10.45 वाजेपर्यंत म्हणजेच एकूण 13 तास केले जाणार आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक विभागांचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. या 13 तासांच्या कालावधीत शहर विभाग व पूर्व उपनगरांमध्ये 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. दरम्यान ठाणे, भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या हद्दीतील ज्या भागास मुंबई महापालिकेकडून पाणीपुरवठा होतो, त्या भागांमध्येही 15 टक्के पाणीकपात लागू होणार आहे.
इथे होणार पाणीकपात
एफ-दक्षिण विभाग – पूर्ण विभाग. एफ-उत्तर विभाग – पूर्ण विभाग. टी विभाग – मुलुंड (पूर्व) आणि (पश्चिम) क्षेत्र. एस विभाग – भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) क्षेत्र. एन विभाग – विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर. एल विभाग – कुर्ला (पूर्व) क्षेत्र, एम पूर्व विभाग – पूर्ण विभाग. एम पश्चिम विभाग – पूर्ण विभाग.