
मुंबई महानगर प्रदेशात घरांच्या विक्रीत 25 टक्क्यांनी घट झाली आहे. तर संपूर्ण देशात घरांची विक्री 20 टक्क्यांनी कमी झाली आहे. महागलेली घरं, जागतिक पातळीवर वाढलेला तणाव यामुळे देशातील सात महानगरांमध्ये घरांची विक्री कमी झाली आहे. साधारण 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून या काळात घरांची विक्री 2024 च्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी कमी झाली आहे. या सर्वाधिक फटका मुंबई महानगर प्रदेश भागावर झाला आहे. 2024 साली 41 हजार 540 घरं विकली गेली होती. या वर्षी फक्त 31 हजार 275 घरं विकली गेली आहेत. म्हणजेच मुंबई महानगर भागात घरांची विक्री 25 टक्क्यांनी घट झाली आहे. अॅनारॉक या रिअल इस्टेटसंबंधी सल्लागार संस्थेने याबाबत अहवाल सादर केला आहे.
2025 च्या दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल-जून) राजधानी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या सात मेट्रो शहरांमध्ये एकूण 96 हजार 285 घरे विकली गेली, तर 2024 च्या त्याच काळात ही संख्या 1 लाख 20 हजार 335 च्या घरात होती.
2025 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत घरांची विक्री मात्र 3 टक्क्यांनी वाढली आहे. विशेषतः चेन्नई 40टक्के, दिल्ली 14टक्के, हैदराबाद 9 टक्के आणि बंगळुरू 1टक्के वाढ झाली आहे. परंतु कोलकात्यात घरांची विक्री 10 टक्क्यांनी घटली असून पुण्यात 4 टक्के तर मुंबई महागनर प्रदेशात घरांची विक्री एक टक्क्यांनी घट झाली आहे.
अॅनारॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत भारतीय गृहनिर्माण बाजारासाठी एक आव्हानात्मक काळ होता. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील लष्करी हालचालींमुळे घर विकत घेणाऱ्यांनी वाट पाहणे पसंत केले. गेल्या दोन वर्षांत घरांच्या किमती प्रचंड वाढल्या असून त्यामुळेही खरेदी मंदावली. मात्र आता देशातील तणाव कमी झाला आहे आणि RBI ने व्याजदरात कपात केल्यामुळे खरेदीदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढू लागला आहे.