कोल्हापूर-कर्नाळ रस्त्याचा 46 कोटींचा निधी परत जाणार; सांगली महापालिकेच्या नाकर्तेपणाचा नागरिकांना फटका

सांगली शहरातील एस.टी. स्टैंड ते अंकली रस्ता चौपदरीकरण व अंकली पोलीस चौकी ते शिवशंभू चौक रस्ता काँक्रिटीकरणासाठी आलेला 46 कोटींचा निधी परतीच्या वाटेवर आहे. महापालिकेने कोल्हापूर रस्त्यावरील जलवाहिनी शिफ्टिंग व कर्नाळ रस्त्यावरील बंधारा कामासाठी विलंब केला आहे. गेल्या वर्षीपासून मनपाकडून हे काम होत नसल्याने ही कामे थांबली आहेत. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

सांगली-कोल्हापूर रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. पण हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्याने कोल्हापूर ते अंकली ते मिरज या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम मंजूर झाले. एस. टी. स्टैंड ते अंकली रस्ता डांबरीकरणात मनपाच्या 1100 मीटरच्या जलवाहिन्या आहेत. त्या शिफ्टिंग करण्यात येणार आहेत. त्यासाठी 27 लाखांचा आराखडा तयार आहे. याला आयुक्तांची पंधरा दिवसांत मान्यता घेतली जाईल. कर्नाळ रोडवर नव्याने तयार करण्यात येणाऱ्या पुलासाठी बंधारा, भराव करण्यासाठी एक कोटी 30 लाखांचा खर्च येणार आहे. त्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, सध्या पावसाळा असल्याने हे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. तरीदेखील या कामासाठी आयुक्तांची मान्यता घेणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी दिली.

एस. टी. स्टैंड ते अंकलीपर्यंतच्या रस्त्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वारंवार अनेक अपघात होत आहेत. याबाबत सामाजिक संघटनांनी आंदोलने केली. रस्ता रुंदीकरणाची मागणी होऊ लागली. त्यानंतर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी या एस.टी. स्टैंड ते अंकलीपर्यंतचा रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला.

अर्थसंकल्पात या डांबरीकरण रस्त्यासाठी 25 कोटींचा निधी आमदार गाडगीळ यांनी मंजूर करून आणला. त्यानंतर या रस्त्यासाठी आणखी 11 कोटींची गरज होती. तो निधीदेखील मंजूर झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्या वर्षीच हा निधी वर्ग झाला आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाची निविदादेखील काढली होती. ठेकेदाराला काम देण्यात आले. त्यानंतर कामाला सुरुवात केली. मात्र, रस्त्याच्या बाजूला असलेल्या मुख्य जलवाहिन्या शिफ्टिंग करणे आवश्यक असल्याने या रस्त्याचे काम थांबविण्याची विनंती महापालिकेने बांधकाम विभागाला केली. बांधकाम विभागानेदेखील मनपाला तातडीने काम करण्याची विनंती केली. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून महापालिकेने हे काम पूर्ण केले नाही. या परिसरातील 1100 मीटरची जलवाहिनी शिफ्टिंग करण्यासाठी 27 लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. पण महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. सध्या या रस्त्यावर पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. बांधकाम विभाग व महापालिकेने या रस्त्याची दुरुस्ती केली नाही. रस्त्याचे काम मंजूर असल्याने याची दुरुस्ती झालेली नाही. मात्र, याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे.

शेरीनाल्याचा सध्या असलेला पूल मोठा करण्यात येणार आहे. पुराचे सर्वप्रथम पाणी या शेरीनाल्याच्या पुलावर येते. कृष्णा नदीची पाण्याची पातळी 35 फूट झाली की कर्नाळ रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो. अनेक वाहनांना कॉलेज कॉर्नरमार्गे प्रवास करावा लागतो. मात्र, या ठिकाणी बंधाऱ्याचे काम करून घेणे आवश्यक होते. ते महापालिकेने केले नाही. त्यासाठी एक कोटी 30 लाखांचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. पण यालादेखील तत्कालीन आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता दिलेली नाही. त्यामुळे हे काम रखडले आहे. त्यामुळे यावर्षी कृष्णा नदीची पाणीपातळी 35 फुटांवर गेली तर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होणार आहे. दोन्ही रस्त्यांसाठी तब्बल 46 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला, तरी महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे या दोन्ही रस्त्यांचे काम रखडले असल्याने निधी परत जाण्याची शक्यता आहे.