आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून 5 हजार 200 विशेष बसेस सोडणार

आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5 हजार 200 विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक,पंढरपूर येथे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी पंढरपुरात येतात. अनेक प्रवाशी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींबरोबर चालत दिंडीने येतात या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. या प्रवासात देखील 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.

तसेच आषाढी यात्रा काळात लांबच्या पल्याहून एसटी बसेस येत असतात. त्या बस चालकांना व वाहकांना राहण्याची चांगली व्यवस्था करावी त्याचबरोबर त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून द्यावे. बस स्थानकातून बस प्रवाशांना घेऊन जाण्याअगोदर बसची देखभाल दुरुस्ती करावी. एसटी बसच्या तात्काळ दुरुस्तीसाठी ज्यादा तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी केल्या.

भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.

तसेच यात्रा काळात पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चहा – नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

गतवर्षी वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त 5000 विशेष बसेस सोडल्या होत्या. याव्दारे यात्राकाळामध्ये सुमारे 21 लाख, भाविक – प्रवाशांची सुखरूप ने-आण एसटीने केली होती अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम*

यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर 12 ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे अशा फुकटया प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे 200 सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवूनअसणार आहेत.

वाहतूकीच्या नियोजनासाठी एसटीची मदत

एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात अशा वेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होतो यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने 36 पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस प्रशासनाला एसटीची मदत होणार आहे.

यात्रा कालावधीत चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठीयात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आदी सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेस

चंद्रभागा बसस्थानक येथून मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग वपंढरपूर आगार

भिमा यात्रा देगाव – छत्रपती संभाजी नगर , नागपूर व अमरावती प्रदेश

विठ्ठल कारखाना – नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर

पांडुरंग बसस्थानक – सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग