
गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने चांगली साथ दिली आहे. जिल्ह्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील 83 प्रकल्पांत आताच 81 टक्के पाणीसाठा झाला आहे, तर 56 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरेल, अशी शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.
सांगली जिल्ह्यात पाच मध्यम व 78 लघु असे एकूण 83 पाणी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता 9 हजार 440 दशलक्ष घनफूट इतकी आहे. मात्र, गतवर्षी पावसाने दडी मारल्याने प्रकल्पामध्ये पाणीसाठा कमी झाला होता. जिल्ह्यात जत आणि आटपाडी तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरअखेर अवघा 35 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
यंदा मे, जून महिन्यापासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील 83 प्रकल्पांपैकी 56 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. खानापूर, तासगाव, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यातील हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. जत तालुक्यातील सर्वाधिक म्हणजेच 15 प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागला आहे. यंदा प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यापर्यंत पाणी कमी पडणार नाही, असा अंदाज पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.