अलिबागमध्ये मच्छीमार बोट पेटली; 18 खलाशांना वाचवले, पहाटेच्या सुमारास भरसमुद्रात थरार

अलिबागच्या समुद्रात आज पहाटे मच्छीमार बोटीने अचानक पेट घेतला. ही आग इतकी भयंकर होती की काही क्षणात संपूर्ण बोटच आगीच्या ‘जाळ्यात’ अडकली. जिवाच्या आकांताने मदतीसाठी टाहो फोडणाऱ्या मच्छीमारांनी एकापाठोपाठ एक समुद्रात उड्या मारल्या. भरसमुद्रात सुरू असलेला हा थरार पाहून त्याच भागात मच्छीमारी करत असलेल्या मासेमारी बोटींनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच नौदलासह कोस्ट गार्डची टीमदेखील दुर्घटनास्थळी दाखल झाली. त्यामुळे १८ खलाशांना वाचवण्यात यश आले.

अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील राकेश गण यांच्या मालकीची एकवीरा माऊली ही मच्छीमार बोट मासेमारीसाठी गेली होती. मात्र सहा ते सात नॉटिकल मैलावर ही बोट जाताच बोटीच्या इंजिनाच्या टर्बोमध्ये बिघाड झाला. त्यामुळे ऑइल सायलेन्सरमध्ये जाऊन इंजिनने पेट घेतला. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केल्याने जवळपास ८० टक्के बोट जळून खाक झाली. पहाटे तीन ते चारच्या दरम्यान भरसमुद्रात उडालेल्या या आगीचा भडका आणि खलाशांच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकून परिसरातील मच्छीमार बोटींनी मदतीसाठी धाव घेतली. नौदल व कोस्टगार्डच्या टीमनेदेखील माहिती मिळताच ऑपरेशन बचाव हाती घेतले. आगीच्या भीतीने समुद्रात उड्या टाकलेल्या १८ खलाशांना तत्काळ वाचविण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

अपघातांची मालिका सुरूच

१ – १२ जानेवारी २०२३ : १ अलिबाग कोळीवाडा येथील अन्नपूर्णा लक्ष्मी बोटीला जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेतील तीन जणांना वाचविण्यात यश आले. मात्र एकाचा मृत्यू झाला.
२ – ३ एप्रिल २०२३ :
तत्कालीन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत व छत्रपती संभाजी राजे यांना घेऊन जाणाऱ्या स्पीड बोटीला मांडवा येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला होता.
३ – २ डिसेंबर २०२३: मांडवा बंदरात खासगी बोटीला आग. यात दोन जण गंभीर जखमी झाले. बोटीतील जनरेटरमुळे ही आग लागली होती.
४ – ३१ मार्च २०२४ : अलिबागच्या साखरपट्टी भागात प्रवाशांनी खचाखच भरलेली बोट उलटली. खांदेरी किल्ल्यावरील वेताळ देवाचे दर्शन घेऊन ही बोट परतत होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
५ – १८ डिसेंबर २०२४ : गेट वे ऑफ इंडिया-एलिफंटा येथे जाणारी नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीची धडक बसली. यात १५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
६ – ७ जानेवारी २०२५ : कुलाबा किल्ला परिसरात आक्षी साखर येथील हिरकण्या ही बोट बुडाली. या दुर्घटनेतील १५ खलाशांना अन्य बोटीवरील खलाशांनी वाचवले.