अपमानास्पद मजकूर पोस्ट करणाऱ्यांची कपडे काढून धिंड काढू! मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आक्रमक

सोशल मीडियावर अपमानास्पद मजकूर पोस्ट करणाऱ्यांची सार्वजनिक ठिकाणी कपडे काढून धिंड काढू, असा इशारा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज दिला. रेड्डी यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दलच्या अपमानास्पद पोस्टमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली. अलीकडेच दोन महिला पत्रकारांना अटक करण्यात आली. त्यावरून भारत राष्ट्र समितीने मुख्यमंत्र्यांना घेरले असता रेड्डी यांनी संताप व्यक्त केला. स्वतःला पत्रकार भासवून लोकप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांची गैर केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विधानसभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रेड्डी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मुळात पत्रकार कोण आहे? हे परिभाषित करण्याची वेळ आली आहे. मीडिया संघटना, पीआर आणि इतर अधिकृत एजन्सी यांनी पत्रकाराची व्याख्या करून त्यांची नावे सरकारला द्यावी. त्यांना सूट दिली जाऊ शकते, पण पत्रकार असल्याचे भासवून काहीही पोस्ट करणाऱ्यांना गुन्हेगार मानले जाईल आणि कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

दरम्यान, तेलंगणातील स्थानिक यूट्यूब चॅनलवरील व्हिडीओमध्ये एका शेतकऱ्याने तेलुगूमध्ये शिवीगाळ करत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. रेवंत रेड्डी यांच्या कुटुंबातील सदस्य आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करत संबंधित शेतकऱ्याने अश्लील भाषेचा प्रयोग केला होता. या प्रकरणी 10 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आणि 12 मार्च रोजी संबंधित यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली.

मी खूप संयम बाळगला

भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला. ‘‘बीआरएसने अलीकडेच दोन महिला पत्रकारांच्या अटकेचा निषेध केला. त्या पत्रकारांनी माझ्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आणि माझ्याबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह पोस्ट केली होती. मी खूप संयम बाळगला आहे. मात्र आपल्या कुटुंबातील महिलांविरुद्ध सोशल मीडियावर अश्लील भाषा वापरली जात असेल तर मी हे किती काळ सहन करायचे? बीआरएसचे नेते त्यांच्या कुटुंबातील महिलांबद्दल अपशब्द वापरले गेले तर गप्प बसतील का? अशा लोकांची मी कपडे काढून सार्वजनिक ठिकाणी धिंड काढेन. त्यांना माझ्या कुटुंबातील महिलांवर भाष्य करण्याचा अधिकार नाही,’’ असे रेड्डी यांनी नमूद केले.