
यंदाही आंब्याचे प्रमाण कमी असून त्यातच अवकाळीमुळे आंब्याला चांगलाच फटका बसला आहे. दरही पडले असून मागणीवरही परिणाम झाला असून, आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत आले आहेत. शासनाने आंबा उत्पादकांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष प्रदीप सावंत, ज्येष्ठ बागायतदार टी. एस. घवाळी, मनीष बांदिवडेकर, अल्ताफ काझी, इम्रान पावसकर, दीपक उपळेकर, बावा साळवी आदींनी केली. आंबा बागायतदारांचा पीक वाचवण्यासाठी दरवर्षी अमाप खर्च औषधांवर होत आहे. या वर्षी मार्चमध्ये पडलेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात मोहाराची गळती झाली.
आंबा आता अखेरच्या टप्प्यात असताना, मेच्या पहिल्याच आठवड्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याला फटका बसला आहे. हवामान बदलामुळे या वर्षी एकदाच मोहर फुलला. त्यामुळे आंबा पीक कमी आले आहे. सन 22-23 मध्ये आंबा उत्पादकांच्या शासनाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक मीटिंग झाल्या, परंतु त्याचा म्हणावा तसा फायदा आंबा शेतकऱ्यांना झाला नाही.