गोवंडीतील दोन तरुण कर्जतच्या धरणात बुडाले; त्यांनी अखेर सूर्योदय पाहिलाच नाही

सूर्योदय पाहण्यासाठी कर्जतच्या पाली – भूतिवली धरणावर गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इम्रान खान आणि खालिद शेख अशी मृतांची नावे असून त्यांनी अखेर सूर्योदय पाहिलाच नाही. ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. इतेश खांदू हा किनाऱ्यावर बसल्यामुळे तो बचावला. या घटनेमुळे खान आणि शेख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुंबई येथील गोवंडी परिसरात राहणारे इम्रान खान, खालिद शेख आणि इतेश खांदू हे तिघे मित्र रविवारी पहाटे कारने कर्जतच्या पाली-भूतिवली धरणावर गेले. त्यांच्या सोबत एक कुत्रादेखील होता. उगवणाऱ्या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी पहाटेच धरणावर हजेरी लावली. दरम्यान पहाटे पाचच्या सुमारास इम्रान आणि खालिद हे दोघे धरणात पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले.