
22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा बदला अवघ्या 22 मिनिटांत दहशतवाद्यांचे 9 मोठे तळ उद्ध्वस्त करून घेतला. मी डोके थंड ठेवतो, पण रक्त गरम आहे आणि आता तर माझ्या धमन्यांत रक्त नाही, तर गरम सिंदूर वाहतोय, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. युद्ध असो किंवा व्यापार, प्रत्येक मोहिमेचा इव्हेण्ट करून भाजपला पोर्ट्रेट करणाऱया मोदींनी ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच राजस्थानातील बिकानेर येथे घेतलेल्या जाहीर सभेतही आपलाच जोरदार प्रचार केला.
सिंदूर जेव्हा दारुगोळा बनतो तेव्हा काय होते हे शत्रूने आणि संपूर्ण जगाने पाहिले. जे माताभगिनींचे पुंकू पुसायला निघाले होते त्यांनाच आपण धुळीला मिळवले. हा बदला नाही, तर न्यायाचे स्वरूप आहे. हे ऑपरेशन सिंदूर आहे. हा फक्त आक्रोश नाही, हे समर्थ हिंदुस्थानचे रौद्र रूप आहे, असेही मोदी म्हणाले. आता हिंदुस्थानने स्पष्ट संदेश दिला आहे की, प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानला किंमत मोजावी लागेल. ही किंमत पाकिस्तानचे सैन्य, अर्थव्यवस्था मोजेल. पाकिस्तानने हिंदुस्थानी लष्कराच्या हवाई तळाला लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न केला; परंतु ते या तळाला कणभरही नुकसान पोहोचवू शकले नाहीत. पाकिस्तानचा रहिमयार खान एयरबेस आयसीयूत पडला असून कधी उघडेल हे माहिती नाही, असे मोदी म्हणाले.
आता चर्चा केवळ पीओके आणि दहशतवादावर. आता पाकिस्तानसोबत व्यापार होणार नाही. चर्चा होईल ती केवळ पाकव्याप्त कश्मीर आणि दहशतवादावर, असेही मोदी म्हणाले.
राजस्थानात निवडणूक प्रचारात ‘ऑपरेशन सिंदूर’
देशात बिहार, आसाम, केरळ, तामीळनाडू, पश्चिम बंगाल येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकाही होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मोदींच्या सभेतील भाषणाचा पेंद्रबिंदू ऑपरेशन सिंदूर होता. आमच्या सरकारने तिन्ही सैन्यदलांना पूर्णपणे मोकळीक दिली आणि त्यांनी पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले, असेही मोदी म्हणाले.
दहशतवादाविरोधात लढण्यासाठी तीन सूत्रे
ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरोधात लढण्यासाठी तीन सूत्रे निश्चित केली आहेत. पहिले हिंदुस्थानवर दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल. त्याची वेळ लष्कर निश्चित करेल आणि अटीही आपल्या असतील. दुसरे अण्वस्त्रांच्या गिधड धमक्यांना हिंदुस्थान घाबरत नाही. तिसरे आम्ही दहशतवाद्यांना पोसणारे सरकार आणि दहशतवाद्यांचे म्होरके यांना वेगळे मानणार नाही. त्यांना एकच मानले जाईल. पाकिस्तानचा हा स्टेट आणि नॉन स्टेट अॅक्टरचा खेळ आता चालणार नाही. संपूर्ण जगभरात आता पाकिस्तानला उघडे पाडण्यासाठी सात प्रतिनिधी मंडळे संपूर्ण जगात पोहोचत आहेत, असेही मोदींनी सांगितले.