
हवेचा दाब वाढल्याने मान्सूनची प्रगती थांबलेली आहे. मात्र 12 जूननंतर हवेचा दाब कमी होणार आहे. त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे वाफसे तयार झाले असतील तर शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे पूर्ण करावीत, असा सल्ला ज्येष्ठ कृषी हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.
यंदा मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. मे महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने ओढे, नद्या, नाल्यांना पूर आला. तसेच अनेक गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता आहे. हवामान बदलामुळे खंडात्मक पर्जन्यमानात बदल झाले आहेत. काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस असा मान्सून बरसणार आहे, असे डॉ. साबळे यांनी सांगितले.
जून, जुलै महिन्यात धुळे, राहुरी, परभणी, निफाड, अकोला पाडेगाव आणि कोल्हापूर येथे पावसात खंड राहण्याची शक्यता आहे. दापोली, पुणे, नागपूर, सोलापूर, जळगाव, धुळे व कराड येथे खंडाचा कालावधी कमी राहणार आहे. पश्चिम विदर्भ विभागात सरासरीच्या 105 टक्के, पूर्व विदर्भ आणि मध्य विदर्भ विभागात सरासरीच्या 100 टक्के, मराठवाडा विभागात सरासरीच्या 110 टक्के, कोकणात सरासरीच्या 106 टक्के, उत्तर महाराष्ट्रात 104 टक्के आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीच्या 108 टक्के पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस हा पुणे विभागात सरासरीच्या 115 टक्के पडण्याचा अंदाज असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.
12 जूननंतर पुन्हा पाऊस
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत पावसाने उघडीप दिली आहे. मात्र 12 जूननंतर पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा पाऊस सुरू झाल्यानंतर पेरण्या लांबण्याची शक्यता असते. पेरण्या लांबू नये यासाठी शेतकऱ्यांनी पूर्व मशागतीची कामे पूर्ण करावीत. ज्या ठिकाणी वाफसा तयार झाला आहे तेथे तूर, उडीद, मटकी, चवळी या पिकांची पेरणी केली पाहिजे. मात्र भारी जमिनींमध्ये वाफशासाठी आणखी दोन ते तीन दिवसांची वाट पहावी लागणार आहे. तेवढ्या वेळात पूर्वमशागतीची कामे करावीत. वाफसा तयार झाला असेल तर ज्वारी, सूर्यफूल, मका, सोयाबीन, कापूस याच्या पेरण्यादेखील करून घ्याव्यात. तसेच पाऊस उघडला आहे, तोपर्यंत हळद आणि आलं लागवडदेखील करून घ्यावी, असेही डॉ. साबळे यांनी सांगितले.