‘नीट’ परीक्षेत कृष्णांग जोशी महाराष्ट्रातून अव्वल

राष्ट्रीय चाचणी कक्षाने वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेचा (नीट यूजी) निकाल जाहीर केला. पहिल्या 10 विद्यार्थ्यांच्या यादीत महाराष्ट्रातील 2 विद्यार्थी आहेत. राजस्थानचा महेश कुमार याने ऑल इंडिया रँक (एआयआर) पहिला, दुसऱया क्रमांकावर मध्य प्रदेशचा उत्कर्ष अवधिया, महाराष्ट्रातील कृष्णांग जोशी या विद्यार्थ्याने देशात तिसरा आणि आरव अग्रवालने देशात दहावा क्रमांक पटकावला आहे.

वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेसाठी (नीट 2025) महाराष्ट्रातून एकूण 2 लाख 48 हजार 201 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 2 लाख 42 हजार 858 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 1 लाख 25 हजार 727 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर गेल्या वर्षी 2024 साली एकूण 2 लाख 82 हजार 51 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 2 लाख 75 हजार 442 विद्यार्थ्यांनी परीक्षा आणि 1 लाख 42 हजार 829 विद्यार्थी पात्र ठरले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत 17 हजार 102 ने घट झालेली आहे.

या परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार याने 99.9999547 च्या टक्केवारी गुणांसह ऑल इंडिया रँक (एआयआर) 1 मिळवला आहे. त्यानंतर दुसऱया क्रमांकावर मध्य प्रदेशचा उत्कर्ष अवधिया आहे ज्याने 99.9999095 इतकी टक्केवारी आणि तिसऱया क्रमांकावर असलेला महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी ज्याला 99.9998189 टक्केवारी मिळाली आहे.

NEET UG 2025 च्या निकालांमध्ये, दिल्ली हे ऑल इंडिया टॉप 10 यादीत सर्वाधिक उमेदवारांसह आघाडीचे राज्य ठरले आहे. आकडेवारीनुसार, दिल्लीतील तीन विद्यार्थ्यांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे, त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरातचा प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांसह क्रमांक लागतो. राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबचा प्रत्येकी एक उमेदवार टॉप 10 मध्ये आहे.

दरम्यान, सर्वोच्च गुण पटकावणाऱया 20 मुलींच्या यादीत महाराष्ट्रातील सिद्धी बढे या विद्यार्थिनीने तिसरा (नीट क्रमांक 26), उर्जा शहा हिने पाचवा (नीट क्रमांक 31), इश्मित काwर हिने बारावा (नीट क्रमांक 85) क्रमांक पटकावला आहे. तर सर्वोच्च 20 मुलांच्या यादीत महाराष्ट्रातील कृष्णांग जोशी या विद्यार्थ्याने तिसरा (नीट क्रमांक 3), आरव अग्रवाल याने नववा क्रमांक (नीट क्रमांक 10) आणि उमेद खान याने एकोणिसावा (नीट क्रमांक 21) क्रमांक पटकावला आहे. तर यंदा ‘नीट’ परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 12 लाख 36 हजार 531 विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.