मुंबईच्या माथी अदानीचे स्मार्ट मीटर मारू नका! शिव विधी व न्याय सेनेची बेस्ट महाव्यवस्थापकांकडे मागणी

मुंबईकरांच्या घरांमध्ये परवानगी न घेता बेस्टच्या मीटरऐवजी सक्तीने अदानीचे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. या स्मार्ट मीटरचे भरमसाट बिल येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यात कोणतीही पारदर्शकता नाही. किरणोत्सर्ग होत असल्यामुळे हे मीटर आरोग्यालाही घातक आहेत. बेस्ट ग्राहकाला नको असलेले मीटर नाकारण्याचा अधिकार हवा. केवळ अदानीच्या फायद्यासाठी स्मार्ट मीटर मुंबईकरांच्या माथी मारू नका, अशी मागणी शिव विधी व न्याय सेनेच्या उपाध्यक्षा अ‍ॅड. स्वप्ना कोदे यांनी बेस्ट महाव्यवस्थापक श्रीनिवास यांच्याकडे केली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने अदानी समूहाने मुंबईकरांची परवानगी न घेता बेस्टच्या मीटरऐवजी अदानीचे मीटर बसवायला सुरुवात केली आहे. याला मुंबईकरांनी जोरदार विरोध केला आहे. काही शास्त्रीय अभ्यास व ग्राहक अहवालांमध्ये स्मार्ट मीटरमधून होणाऱ्या किरणोत्सर्जनामुळे आरोग्याला धोका संभवतो, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यात मीटर इतका स्मार्ट आहे की, विजेचे बिलही भरमसाट देतो. या मीटरमुळे डिजिटल गोपनीयता, माहितीचा गैरवापर आणि सायबर सुरक्षेचा धोकाही संभवतो. ज्या मुंबईकरांना स्मार्ट मीटर हवा त्यांनीच तो घ्यावा, इतरांना तो नाकारण्याचा अधिकार हवा, अशी मागणी संघटनेच्या उपाध्यक्षा स्वप्ना कोदे यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीनिवास यांच्याकडे केली आहे.