
लाडक्या बहिणींना दिलेला वायदा पूर्ण करताना सरकारची चांगलीच दमछाक झाली असून शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. मात्र यावर्षी एकाच गणवेशावर मुलांचे स्वागत केले जाणार आहे. दुसरा गणवेश दिवाळीला दिला जाणार असल्याने लाखो मुलांना आठवडाभर मळका, घामेजलेला युनिफॉर्म घालून शाळेत जावे लागणार आहे. नियोजनशून्य कारभारामुळे सरकारचा ‘खिसा’ फाटला असल्याने शिक्षण विभागाला फटका बसला असल्याची टीका पालकांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश मोफत देण्यात येतात. मात्र सध्या शासनाकडून एका गणवेशाचा निधी प्राप्त झाला होता. सदर निधी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या स्तरावर विद्यार्थ्यांसाठी गणवेश शिवून घेण्यात आले आहेत. आता गणवेशाची शिलाई पूर्ण झाल्यानंतर व सॉक्स, बूट खरेदी करून त्यांची पावती गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे द्यायची आहे. सध्या एका गणवेशासह सॉक्स, बूट खरेदी करण्यात आले असून ते विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी देण्यात येणार आहेत. दरम्यान एकच गणवेश मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना आठवडाभर तोच गणवेश घालून शाळेत यावे लागणार आहे. वास्तविक पाहता, दोन्ही गणवेशात किमान एक महिन्याचा फरक असणे आवश्यक आहे; पण निधीअभावी रायगडातील जिल्हा परिषद, नगर परिषद, अनुदानित शाळांमधील 98 हजार 572 विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशासाठी काही महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे.
दुसरा गणवेश दिवाळीपूर्वी
विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून दोन गणवेश दिले जातात. एक गणवेश शाळेचा तर दुसरा गणवेश स्काऊट गाईडच्या धर्तीवर मिळणार आहे. तो गणवेश दिवाळीपूर्वी मिळेल, असे नियोजन आहे. सध्या पहिल्या गणवेशाचा निधी शासनाकडून वितरित झाला आहे. हा गणवेशदेखील यंदा शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातूनच दिला जाणार आहे. गतवर्षी कापड कटिंग करून तो बचत गटांच्या माध्यमातून शिलाई करून देण्यात आला होता.