राज्य कायद्याचे की उपऱ्या झुंडांचे? वर्ध्यात सोमय्यांचा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनवर कब्जा

केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उपऱ्या झुंडांची दादागिरी वाढताना दिसत आहे. भाजप पदाधिकाऱयांकडून प्रशासनातील अधिकाऱयांना धमकावण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यातच भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या वर्धा येथे उपजिल्हाधिकाऱयांच्या खुर्चीत जोरजबरदस्तीने बसून कारभार हाकत असल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यातून राज्यात कायद्याचा कुणाला धाकच राहिलेला नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आरोपांची राळ उडवून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या भाजपच्या किरीट सोमय्या यांनी रोहिंग्या मुस्लिमांना दिलेल्या दाखल्याच्या विरोधात मोहीम उघडली आहे. राज्यात भाजपची सत्ता असल्याने मनमानी पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन ते आढावा घेत आहेत. यासाठी सोमवारी वर्धा जिह्याच्या दौऱयावर आलेल्या सोमय्या यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बस्तान मांडत संबंधित अधिकाऱयांशी चर्चा केली. उपजिल्हाधिकारी दालनात नसताना त्यांच्या कार्यालयात घुसखोरी करणाऱया सोमय्यांच्या कृतीवरून जोरदार टीका होऊ लागली आहे.

भाजपच्या किरीट सोमय्या यांनी उपजिल्हाधिकाऱयांच्या खुर्चीत बस्तान मांडल्याचा फोटो सोशल मीडियातून व्हायरल होताच एकच गदारोळ उडाला. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘अभ्यासू लोकांच्या खुर्चीवर असे ऐरेगैरे लोपं बसूच कसे शकतात’, असा प्रश्न एक्स पोस्ट करत केला आहे. भाजपशासित राज्यात प्रशासकीय अधिकाऱयांचे पार पोतेरे करून ठेवलेय, अशी टिपण्णी त्यांनी केली. काँग्रेस समर्थकांनी सोमय्या यांच्या कृतीवर आक्षेप घेतला आहे. मात्र ही टीका चुकीची असल्याचा दावा भाजप पदाधिकारी श्रीधर देशमुख यांनी केला. सोमय्या दालनात गेले होते तेव्हा उपजिल्हाधिकारी दालनात नव्हते. म्हणून त्यांच्या कर्मचाऱयांसोबत बसून सोमय्या यांनी चर्चा केल्याचे म्हटले आहे. या भेटीनंतर त्यांनी जिल्हाधिकारी वॉन्मथी सी. यांची भेट घेतल्याचे ते म्हणाले.