रत्नागिरी, सिंधुदुर्गात जनजीवन विस्कळीत

गत चार दिवसांपासून बरसणाऱ्या संततधार पावसामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज राजापूर, चिपळूण, खेड संगमेश्वरमध्ये धुवाँधार पाऊस झाल्याने सर्वत्र हाहाकार उडाला होता. कशेडी घाटात दरड कोसळल्याने महामार्गावरील तर पाटण तालुक्यातील पूल वाहुन गेल्याने चिपळूण-कराड वाहतूक विस्कळीत झाली होती. करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक फोंडा व भुईबावडा मार्गे वळवण्यात आली होती. राजापूरमधील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आल्याने प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सिंधुदुर्ग जिह्याला गेल्या 24 तासांत मुसळधार पावसाने झोडपल्याने ठिकठिकाणी पडझड झाली, तर तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

राजापुरात पूर

गेले तीन दिवस रत्नागिरी जिह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.आज राजापूर तालुक्यातील अर्जुना नदी आणि कोदवली नदीला पूर आला. पुराचे पाणी राजापूर शहरातील जवाहर चौकात शिरले. पुरामुळे बाजारपेठेतील व्यापाऱयांचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिह्यात गेल्या 24 तासात 113.54 मिमी पाऊस पडला.