
मुंबईत रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईच्या विविध भागात पाणी तुंबल्यामुळे रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मुंबई-ठाण्यात लोकलसेवा कोलमडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले तर सिंधुदुर्ग-रत्नागिरीसह राज्याच्या विविध भागांत झालेल्या पावसामुळे रस्ते, शेती पाण्याखाली जाऊन जनजीवनही विस्कळीत झाले. यातच पुढील पाच दिवस पावसाचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्यामुळे सर्वांचेच टेन्शन वाढले आहे.
मुंबई-महाराष्ट्रात यावर्षी तब्बल दहा दिवस आधी इंट्री घेतली. मेअखेर झालेल्या पावसाने तर सर्वांचीच तारांबळ उडाली. मात्र यानंतर दोन आठवडे विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारपासून पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. वासिंद ते आसनगावदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आज रात्री रेल्वे वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे ऐन पावसात हाल झाले. दरम्यान, पावसाची ही स्थिती पुढील पाच दिवस कायम राहणार असून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार असल्याचेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या विभागांना झोडणार
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुण्यासह अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे हवामान खात्याकडून जारी करण्यात आल्यामुळे प्रशासनानेही नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नोकरदारांना लेटमार्क
मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून हजेरी लावलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी पीक अवर्सला लोकल सेवेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर लोकल गाड्यांना 15 ते 30 मिनिटांचा विलंब झाल्याने कामावर जाण्यासाठी घाई करणाऱ्या नोकरदारांची गैरसोय झाली. पावसाच्या जोरामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्याने प्रवाशांची रेल्वे स्थानकांत प्रचंड गर्दी झाली होती. काही एसी फेऱ्या रद्द करण्यात आल्याने त्या प्रवाशांचा सामान्य लोकल फेऱ्यांवर ताण आला. सायंकाळी 4 वाजेपर्यंत गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते.
झाड कोसळून चारजण जखमी
मुंबईला सोमवारीही दिवसभर चांगलेच झोडपून काढले. मुंबईत पावसाबरोबर वाऱ्याचा जोरही कायम असल्यामुळे पडझडीच्या घटना घडल्या. 36 झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या तर घर, इमारतीचा भाग कोसळण्याच्या 8 घटना घडल्या. दरम्यान, देवनार आणि अंधेरी येथे झाड अंगावर कोसळल्याने दोघे जण जखमी झाले तर जोगेश्वरी येथे इमारतीच्या परांचीचा भाग कोसळून दोघे जण जखमी झाले. यातील एकाही प्रकृती गंभीर आहे.