भराव दबला हे नैसर्गिक! बांधकाम विभागाचे तर्कट; अधिकारी म्हणतात, राजकोटवरील छत्रपती शिवरायांचा पुतळा मजबूत

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यात आला. त्याचे उद्घाटन झाल्यानंतर महिनाभरातच पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळ भगदाड पडले. त्यावर आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजब तर्कट मांडले आहे. पुतळा उभारल्यानंतर हा पहिलाच पावसाळा आहे. त्यामुळे तिथला भराव दबणे है नैसर्गिक आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुतळ्याचा चबुतरा काँक्रीटचा आहे आणि त्याच्या भोवताली मातीचा भराव टाकलेल्या आहे. हा भराव पावसात दबतो. तसाच प्रकार घडला आहे. जे झाले ते नैसर्गिक आहे. त्याने पुतळ्याला कोणताही धोका उद्भवत नाही. हा पुतळा 100 वर्षे टिकेल इतका मजबूत आहे, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला.

अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा

प्रत्यक्षात पुतळ्याभोवती जमीन खचल्याचे स्पष्ट दिसत आहे. चौथऱयाचा पायाला चिऱ्यांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. भोवताली सर्वत्र चिरेच लावण्यात आलेले आहेत. असे असताना मातीचा भराव दबल्याचे सांगून अधिकारी या दुर्घटनेवर सारसारव करत असल्याचे स्पष्ट आहे.

पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱया अधिकाऱयाला मंत्रालयात बढती!

राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱया बांधकाम विभागाच्या अधिकाऱयावर कडक कारवाई व्हायला हवी होती, पण त्याला मंत्रालयात बढती मिळाली असून तो मंत्र्याचा ओएसडी बनून मिरवतोय, असा पर्दाफाश शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज केला. पुतळ्याच्या चबुतऱयाभोवतीची जमीन भ्रष्टाचारामुळेच खचली असून याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.