
राजा रघुवंशीच्या हत्येला आता तेरा दिवस पूर्ण झाले असून, राजाच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूसाठी काळ्या जादूचा उल्लेख केला आहे. राजाच्या वडिलांनी केलेल्या या विधानामुळे सोनमने राजावर काळी जादू केल्याचे आता म्हटले जात आहे. त्यामुळे या खूनाला आता वेगळे वळण लागत आहे.
मेघालय पोलिसांनी राजा रघुवंशी (29) यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली त्यांची पत्नी सोनम (25), तिचा प्रियकर राज कुशवाह (20) आणि कुशवाहच्या तीन मित्रांना अटक केली आहे. राजा रघुवंशी 23 मे रोजी मेघालयात त्यांच्या मधुचंद्रादरम्यान बेपत्ता झाला होता. 2 जून रोजी त्यांचा मृतदेह एका खोल दरीत सापडला.
इंदूर येथील राजा रघुवंशीच्या घरी तेराव्या दिवसाच्या विधीनंतर त्यांचे वडील अशोक रघुवंशी यांनी पत्रकारांना सांगितले की, “सोनमच्या विनंतीवरून राजाने आमच्या घराच्या मुख्य दारावर एक वस्तू लटकवली. सोनमने राजाला सांगितले होते की, ते लटकवल्याने घरात राहणाऱ्या लोकांवर वाईट नजर लागणार नाही.”
राजाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाच्या हत्येनंतर त्यांना सोनम तंत्र-मंत्रावर विश्वास ठेवते असा दाट संशय आहे. अशोक रघुवंशी यांनी सांगितले की, राजाच्या हत्येनंतर, त्यांच्या घरातून ही लटकवलेली वस्तू काढून टाकण्यात आली. त्यांनी मागणी केली की त्यांच्या मुलाच्या हत्येत दोषी आढळणाऱ्या लोकांना फाशी देण्यात यावी.
राजा रघुवंशीची आई उमा म्हणाली की, राजा आणि सोनम दोघेही त्यांच्या जन्मकुंडलीनुसार दोघांनाही मंगळ होता. परंतु त्यांचे लग्न विधीवत तसेच सोनमच्या कुटुंबाच्या ज्योतिषाने ठरवलेल्या मुहूर्तानुसार झाले होते. त्या म्हणाल्या, “सोनम लग्नानंतर फक्त चार दिवस सासरी राहिली. आम्ही तिला आनंदाने तिच्या माहेरी पाठवले. मी तिला कधी भेटले तर, तिला फक्त एकच विचारेन की तिने माझ्या मुलाला का मारले?”
राजा रघुवंशीचा मृतदेह 2 जून रोजी पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा भागात (ज्याला चेरापुंजी असेही म्हणतात) धबधब्याच्या जवळ एका खोल खड्ड्यात सापडला होता. राजा रघुवंशीचे कुटुंब वाहतूक व्यवसायात गुंतलेले आहे. त्याने 11 मे रोजी इंदूरमध्ये सोनमशी लग्न केले आणि 20 मे रोजी दोघेही हनिमूनसाठी मेघालयला रवाना झाले. मेघालय पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) राजा रघुवंशी यांच्या हत्येचा सखोल तपास करत आहे.