
विठ्ठल जीवाचा जिव्हाळा ।
विठ्ठल कृपेचा कोवळा ।।
विठ्ठल प्रेमाचा पुतळा ।
लावियेला चाळा विश्व विठ्ठले ।।
तुकोबांच्या या अभंगवाणीप्रमाणे पंढरीच्या सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस लागलेल्या लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने बुधवारी (दि.18) देहूतून दुपारी तीन वाजून 58 मिनिटांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पालखी सभामंडपातून बाहेर पडताच वरूणराजाने पालखीवर जलाभिषेक केला अन् लाखो भाविक भक्तीरसात न्हाऊन गेले.
पालखीचा पहिला मुक्काम आज देहुतच, इनामदारवाडयात असणार आहे. यंदा पालखी सोहळ्याचे 340 वे वर्ष आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून 500 दिंडया सहभागी झाल्या आहेत.
सोहळ्याच्या कार्यक्रमांना चौघडयाच्या निनादात पहाटेपासूनच सुरुवात झाली. पहाटे साडेचार वाजता काकड आरती झाली. पहाटे पाच वाजता श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे यांच्या हस्ते हस्ते महापूजा करण्यात आली. संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे आदींच्या हस्ते महाअभिषेक झाला. विठ्ठल-रूक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्त उमेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे आदींच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांमुळे वारकरी वेठीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालखी सोहळा प्रस्थानासाठी येणार असल्यामुळे पोलिसांनी दरवर्षीपेक्षा यंदा जास्त बंदोबस्त ठेवला होता. मुख्यमंत्री पावणेतीनच्या सुमारास मंदिरात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह आदींच्या हस्ते पादुका पुजन करण्यात आले. यावेळी मानाच्या दिडय़ांचा प्रवेश रोखला. त्यामुळे वारकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तसेच धक्काबुक्की झाली.